कोहलीच्या संघाशी सामना करत मैदानावर सन्मान मिळावा
मुंबई – भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरीही त्याने मैदानावर प्रत्यक्ष सामना खेळतानाच निवृत्त झाले असते तर ते जास्त संयुक्तिक ठरले असते, असे मत माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू इरफान पठाण याने व्यक्त केले आहे. तसेच ज्या खेळाडूंना प्रत्यक्ष मैदानावर निवृत्ती घेता आली नाही त्यांना एकत्र आणून एक संघ तयार करावा व त्याचा सामना विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाशी खेळवावा व त्यांचा मैदानावरच सन्मान करावा, असेही त्याने व्यक्त केले आहे.
राहुल द्रविड, हरभजनसिंग, सुरेश रैना, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवान, युवराजसिंग आणि आता धोनी यांच्यासह आणखी काही खेळाडू आहेत ज्यांना मैदानावर निवृत्ती घेण्याची संधी मिळाली नाही. सध्या कोहलीच्या नेतृत्वाखालील संघातील अनेक खेळाडूंनी या निवृत्त खेळाडूंसह खेळ केला आहे. त्यामुळे आपल्या आदर्शांच्या संघाशी सामना करायला त्यांनाही आवडेल. बीसीसीआयने निश्चितच या गोष्टीचा विचार करावा, असेही पठाण म्हणाला.
कोणत्याही खेळाडूने निवृत्ती जाहीर केली तर ती मैदानावरच जाहीर करणे योग्य ठरते. काही कारणाने जर या सर्व महान खेळाडूंना हा सन्मान मिळालेला नसेल तर त्यांच्यासाठी असा अभिनव सामना आयोजित करण्याबाबतचा विचार बीसीसीआयने करावा, असे आवाहनही त्याने केले आहे.
एखादा खेळाडू आपल्या आयुष्यातील 10 ते 15 वर्षे देशाच्या संघासाठी देतो. तसेच प्रत्येक सामन्यात सरस कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. मग त्याने अशी गपचूपपणे निवृत्ती घेतली तर ती चाहत्यांना पसंत पडत नाही. ज्या मैदानांवर त्याने देशाचे नाव उंचावले तिथेच त्याने कारकिर्दीची सांगता करावी, असेही तो म्हणाला.