नगर – शासनाच्या आदेशानुसार प्लॅस्टिक वापरावर बंदी असतानाही नगर शहरात खुलेआम प्लॅस्टिक विक्री व प्लॅस्टिकचा वापर सुरू आहे. त्यानुसार मनपाकडून कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. मनपाने गेल्या आठ दिवसात 400 किलो प्लॅस्टिक जप्त केले असून, 2 लाख 2 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे. प्लॅस्टिक विक्री व प्लॅस्टिक बाळगणाऱ्यांवर कारवाई होते, परंतु प्लॅस्टिक बनवणारे कारखाने मात्र जोमात सुरु आहेत. त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी होत असुन, प्रदूषण नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष झाले असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, शहरातील प्लॅस्टिक कारखाने जोमात सुरु असून त्या प्लॅस्टिक पिशव्यांवर (इ.पी.आर.) नंबर नाही. त्यामुळे ते कारखाने अनाधिकृत प्लॅस्टिक उत्पादन करत पर्यावरणाची एक प्रकारे हणी करत आहेत. त्या कारखान्यांवर प्रदूषण मंडळाने कारवाई करावी अशी मागणी होत आहे. प्लॅस्टिक वरील (ई.पी.आर) नंबर ग्राहकांना माहिती नसल्याने ते ही खरेदी करतात व कारवाईला बळी पडतात. त्यामुळे प्रशासनानेच पहिले अनाधिकृत प्लॅस्टिक कारखान्यांवर कारवाई करावी. अशी मागणी व्यावसायीकांमधून होत आहे.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मनपा आयुक्तपदाची सुत्रे घेतल्यानंतर विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. स्वच्छता सर्वेक्षणाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यात प्लॅस्टिक बंदीविरोधात कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार मनपा प्रशासनाकडून शहरात कारवाई करण्यास सुरुवात झाली.
आठ दिवसात तब्बल 400 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. त्यामध्ये 2 लाख 2 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच पहिल्यांदा प्लॅस्टिक सापडल्यास दुकांदाराला 5 हजारांचा दंड, दुसऱ्यांदा 10 हजारांचा दंड, तर तिसऱ्यांदा 25 हजारांचा दंड व तीन महिने कारावसाची तरतुद करण्यात आली आहे. मनपाच्या कारवाईमुळे सर्वसामान्य छोट्या- मोठ्या व्यवसायीकांना वेठीस धरले जाते आहे. त्यामुळे प्रदूषण मंडळाने प्लॅस्टिक कारखान्यांवर कारवाई करावी. अशी मागणी होत आहे.