जनजागृतीकडे कानाडोळा : प्लॅस्टिक बंदीबाबत ग्रामपंचायत स्तरावर उदासीनता
कामशेत – प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेऊन सुमारे 3 वर्षे उलटल्यानंतर देखील अद्याप मावळातील ग्रामपंचायत स्थरावर प्लॅस्टिक बंदी संदर्भात उदासीनता असल्याने कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने मावळात प्लॅस्टिकचा वापर सर्रासपणे सुरू आहे.
मार्च 2018 मध्ये प्लॅस्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत आदेश देण्यात आले होते. त्यानुसार प्लॅस्टिक, थर्माकोल अविघटनशील वस्तूंचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक यावर प्रतिबंध घालण्यात आले होते. त्यावर कारवाई करण्यासाठी ग्रामपंचायत स्थरावर प्लॅस्टिक मुक्ती पथक निर्माण करण्याचे सुचविण्यात आले होते.
प्लॅस्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कृती आराखड्यानुसार अंमलबजावणी करणे, यामध्ये सूचना बोर्ड लावणे, दुकान व वैयक्तिक स्थरावरील प्लॅस्टिक गोळा करणे, रिसायकल करण्याकरिता प्लॅस्टिक पाठवणे, नोटिसा व सूचना देणे, आवाहन करणे, दंडात्मक कारवाई करणे, अहवाल वेळोवेळी सादर करणे व जनजागृती करणे याबाबत सूचित करण्यात आले होते. मात्र जुलै 2019 अखेरपर्यंत ग्रामपंचायतींने दंडात्मक कारवाई केल्याचे दिसून येत नाही. यामुळे जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभाग, आपले सरकार पोर्टलवर व अन्य माध्यमातून नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या आहेत.
प्लॅस्टिक हे मायक्रोनमध्ये मोजले जाते. 50 मायक्रोनच्या वरील प्लॅस्टिक वापरला मुभा आहे. अनेक ग्रामपंचायतींच्या उदासीन कारभारामुळे प्लास्टिकची जाडी (थिकनेस) मोजण्यासाठी वापरण्यात येणारे मशीनचा उपलब्ध नाही. अनेक दुकानात सर्रासपणे वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकवर 51 मायक्रोन अशाप्रकारचे शिक्के मारून वापरात आणले जात आहे. तयामुळे मशीन खरेदी करणार कधी, कारवाई करणार कधी असा प्रश्न पर्यावरण प्रेमी विचारत आहेत.
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगांवर प्लॅस्टिकचे अधिराज्य दिसून येत आहे. यात उकिरड्यावर चरणाऱ्या जनावराच्या पोटात प्लॅस्टिक जाऊन त्यांना गंभीर आजार होत आहेत. प्लॅस्टिक जाळल्याणानंतर निघणाऱ्या धुरामुळे अनेकांना श्वसनाचे विकार जडले असून यावर वेळीच कारवाई होणे गरजेचे आहे.
कारवाईविषयी संभ्रमावस्था
प्लास्टिक बंदीवर कारवाई करण्यासाठी प्लास्टिक मुक्ती पथक नेमणूक करून त्यामध्ये गावचे सरपंच अध्यक्ष व प्रत्येक वार्ड स्थरिय सदस्य व सर्व ग्रामपंचायत मधील वर्ग 3 व 4 चे सर्व कर्मचारी यांचा सहभाग राहील. या सर्वांनी प्लास्टिक बंदीचा आदेश झुगारून प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई करायची आहे.
ग्रामसेवकांना प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहे. कारवाईस टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.
– सुधीर भागवत, गटविकास अधिकारी, मावळ