– एन. आर. जगताप
पृथ्वीवर शेवटपर्यंत काय टिकेल, आज हा प्रश्न जर कुणाला विचारला तर या प्रश्नाचे उत्तर एकच येते ते म्हणजे प्लॅस्टिक. प्लॅस्टिकचा शोध लागल्यापासून ते शाप की वरदान, हे एक कधीही न उलगडणारे कोडेच बनले आहे. याने संपूर्ण पर्यावरणाचाच सत्यानाश केला आहे. मध्यंतरी राज्य शासनाने मोठा गाजावाजा करीत प्लॅस्टिक बंदी जाहीर केली. मात्र, बंदीची योग्य अंमलबजावणी करण्यात शासनाला अपयश आले आहे. त्यामुळे प्लॅस्टिक बंदी हा केवळ फार्स ठरला आहे.
प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी केवळ कागदी घोडे नाचवण्या पुरतीच होती की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या प्लॅस्टिक बंदीच्या बाबतीत असलेल्या उदासिनतेच्या परिणाम स्वरूप तालुक्यातील प्लॅस्टिक बंदी फोल ठरली आहे. ज्याप्रमाणे एखादा शासकीय अध्यादेश आला की सगळी यंत्रणा अचानक खडबडून जागी होते आणि लगेच कारवाईला सुरुवात केली जाते. नंतर हा उसने अवसान घेऊन आलेला जोर काही काळातच ओसरतो आणि ये रे माझ्या मागल्या याप्रमाणे परिस्थिती जैसे थेच राहते. व्यापारी वर्ग, कंपन्या, दुकाने, चिकन व मटन शॉप, फळ विक्रेते हे सर्रासपणे कॅरीबॅगचा वापर करीत आहेत. प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत आहे.
जेजुरीचे खंडोबा मंदिर, नारायणपूरचे दत्त मंदिर, केतकावळ्याचे प्रतिबालाजी मंदिर, माळशिरसचे भुलेश्वर मंदिर, वीर आणि कोडीतचे म्हस्कोबा देवस्थान, सासवडचे सोपानदेव मंदिर, बोपगावचे कानिफनाथ मंदिर ही प्रसिद्ध धार्मिक, तसेच पर्यटनस्थळ आहेत. राज्यभरातून रोज शेकडो भक्त आणि पर्यटक देतात. मात्र, भाविकांनी सोबत आणलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तूंमुळे मंदिर परिसरात प्लॅस्टिक कचऱ्याचा खच पडलेला असतो. सुख आणि मनःशांतीकरीता देवदर्शनासाठी आलेले भाविक परत जाताना मात्र मंदिर परिसरात घाण करून जातात. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या तालुक्यातील या प्रमुख देवस्थानचे प्लॅस्टिक कचऱ्याच्या वाढत्या प्रमाणाबाबत अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
तालुक्यातील सर्वच देवस्थानांनी देवस्थानच्या परिसरात प्लॅस्टिकचा वापर आणि विक्री करणाऱ्यांवर कठोर आणि दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. यासाठी त्यांना पोलीस आणि महसुली प्रशासनाचेही सहकार्य आवश्यक आहे. तरच नैसर्गिक संपत्ती आणि पर्यावरण सुरक्षित राहील.