पुणे – “प्लॅस्टिक बंदी तो महाराष्ट्र मे है, हमारा माल तो दिल्ली, गुजरात से आता है!’ या एकाच वाक्याने प्लॅस्टिक बंदीच्या कारवाईची पोल खोल केली आहे. लष्कर परिसरातील “फॅशन स्ट्रीट’ या बाजारपेठेमध्ये बहुतांश वस्तू या परराज्यातून आयात केल्या जातात. या वस्तूंची पॅकेजिंग प्लॅस्टिकमध्ये केलेली असते. प्लॅस्टिकबंदी असूनही, प्लॅस्टिकचा वापर का? याबाबत येथील व्यावसायिकांना विचारणा केली असता, हा माल परराज्यातून येतो. तिथे तर प्लॅस्टिक बंदी नाही मग आम्ही काय करणार? असे बेजबाबदार वक्तव्य केले जाते.
राज्यात प्लॅस्टिकबंदी लागून होऊन जवळपास एक वर्ष उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही प्लॅस्टिकचा वापर थांबविण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. विशेषत: परराज्यातून विविध प्रकारे येणारा प्लॅस्टिकमाल रोखण्यात प्रशासन पूर्णत: अपयशी ठरत आहे. पुण्यातील “फॅशन स्ट्रीट’ सारख्या बहुतांश बाजारपेठांमध्ये दिल्ली, मुंबई, आग्रा, गुजरात या ठिकाणाहून कपडे, बूट यासारख्या विविध वस्तूंची आयात होते. मात्र, या ठिकाणाहून येणाऱ्या मालाची संपूर्ण पॅकेजिंग ही प्लॅस्टिकमध्ये केलेली असते. हाच माल येथील बाजारपेठांमध्ये विकला जातो. तसेच, वस्तूंसोबतच प्लॅस्टिकचीही देवाण होत असते. अशाप्रकारे हा प्लॅस्टिकमाल पुन्हा एकदा कचऱ्यात पोहोचतो. “फॅशन स्ट्रीट’ येथे तर प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे अक्षरश: ढीग लागले आहेत.