पालिकेची धडक मोहीम थंडावली कारवाईत सातत्याची गरज
सुरेश डुबल
कराड – “स्वच्छ भारत’ अभियानात 2019 मध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या कराड पालिकेच्या पदाधिकाऱ्यांचा यंदाही प्रथम क्रमांक मिळविण्याचा निर्धार आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छतेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. कचरा, नालेसफाईकडे पालिकेचे विशेष लक्ष असले तरी शहरातून प्लॅस्टिक हद्दपार करण्यात पालिका अपयशी ठरली आहे. प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर निर्बंध आणण्यासाठी कारवाईत खंड पडल्याने बाजारपेठेत प्लॅस्टिक पिशव्यांची पुन्हा चलती सुरू झाली आहे.
यंदाही स्वच्छता अभियानात डंका वाजवण्यासाठी पालिकेच्यावतीने स्वच्छतेबरोबर प्लॅस्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन नागरिक, दुकानदार, व्यापाऱ्यांना करण्यात येत आहे. प्लॅस्टिक पिशव्या आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे बजावण्यात येत आहे. मात्र, शहरातील काही दुकानदार, व्यापीा प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर व विक्री करत असल्याचे निदर्शनास येत आहे. या आधी प्लॅस्टिक बंदीसाठी पालिकेच्या पथकाकडून अचानक छापे टाकले जायचे. प्लॅस्टिक पिशव्या आढळल्यास पाच हजार रुपयांपर्यंत दंडही वसूल केला जात असल्याने दुकानदार, व्यापारी प्लॅस्टिक पिशव्यांची विक्री करायला धजावत नव्हते. आता परिस्थिती हळूहळू बदलत आहे.
राज्य सरकारने प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी घातली आहे. त्यामध्ये किराणा, दूध, खाद्यपदार्थांच्या पॅकिंगसाठी प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरास काही निकषांच्या आधारे सवलत दिली आहे. मात्र, पर्यावरण व मानवी आरोग्यास हानिकारक असलेल्या प्लॅस्टिक वापरावर व विक्रीवर निर्बंध आहेत. पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आहे. त्यानुसार पालिकेने शहरातील नागरिक, व्यापारी, दुकानदारांना सूचना दिल्या आहेत.
पालिकेने इतके प्रयत्न करूनही शहरातील काही व्यापारी, दुकानदार नियमांचे उल्लंघन करत प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर व विक्री करत आहेत. मागणी तसा पुरवठा, या न्यायामुळे बाजारातून प्लॅस्टिकच्या पिशव्या पूर्णपणे हद्दपार झालेल्या नाहीत. ग्राहकांनी प्लॅस्टिक पिशव्यांची मागणी केल्यास व्यापारीही चोरून प्लॅस्टिक पिशव्या देत आहेत. यापूर्वी पालिकेकडून प्लॅस्टिकवरील निर्बंधांबाबत धडक मोहीम सुरू होती. त्यासाठी भरारी पथक नेमण्यात आले होते; परंतु आता “स्वच्छ सर्वेक्षण’मुळे पालिकेचे प्लॅस्टिकविरोधी मोहिमेकडे थोडे दुर्लक्ष झाले आहे. बाजारपेठेत हातगाड्यांपासून दुकानांमधून प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. त्यामुळे पालिकेने पूर्वीप्रमाणे धडक मोहीम राबवण्याची गरज आहे.
कापडी पिशव्यांना कमी प्रतिसाद
प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आणताना ताग, कापडी व कागदी पिशव्यांच्या वापराबाबत जागृती केली जात आहे. लोकांमधून त्याला प्रतिसाद मिळत आहे. मॉल्स, मोठ्या दुकानांमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांसाठी वेगळी किंमत द्यावी लागते. त्यामुळे त्यांचा वापर कमी झाला असला तरी छोटी शहरे व ग्रामीण भागात या पिशव्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नाही.
प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर
भाजीवाले, फळ विक्रेते, दुकानदार पातळ व कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांची सर्रास विक्री करत आहेत. नागरिक प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून टाकाऊ अन्न वा वस्त रस्त्यांवर, मोकळ्या जागांवर फेकून देत असल्याने प्रदूषण वाढत आहे.