पिंपरी – पाच वर्षांपूर्वी जिथे काळाने मोठा घाला घातला होता, त्याच माळीण गावांमध्ये जाऊन वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षांमध्ये डोंगरावरील माती धरुन ठेवण्याची क्षमता असते. पुन्हा भविष्यात असे संकट येऊ नये, यासाठी स्वदेशी रोपांची माळीण गावाच्या डोंगरावर 250 देशी रोपांची लागवड करण्यात आली.
हा उपक्रम महाराष्ट्र वनवासी कल्याण आश्रम, पिंपरी-चिंचवड शाखा , ‘गो-ग्रीन’ संस्था आणि पंढरीनाथ विद्यालय, आंबेगाव तालुका,यांनी एकत्रितपणे हाती घेतला आहे. महाराष्ट्र वनवासी कल्याण आश्रमाचे मुख्य समन्वयक नरेंद्र पेंडसे, पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष सुरेश गुरव, सचिव विजय भालिंगे, सहसचिव नारायण ठिकडे, यशवंत भोंग, अरुण काठे, वैभव वाघमारे, गो-ग्रीन संस्थेचे प्रशांत भालेकर, आमडे येथील सरपंच ताई आसवले, पंढरीनाथ विद्यालयाचे विश्वस्त ज्ञानेश्वर कोळप यांनी सामाजिक जाणिवेतून हा उपक्रम राबवला. पाच वर्षांपूर्वी 30 जुलै 2014 रोजी माळीण येथे डोंगरकडा कोसळून सुमारे 151 माणसे काळाच्या उदरात गडप झाली होती.
या क्षेत्रातील विशिष्ट प्रकारची भुसभुशीत माती, डोंगरावरील माती धरून ठेवणाऱ्या झाडांची घटणारी संख्या यामुळे येथील काही मानवी वस्त्यांना असलेला धोका लक्षात घेऊन या संस्थांनी एकत्रित पुढाकार घेतला. गावाच्या मागे डोंगरावरील पठारावर आणि डोंगर उतारावर 250 देशी रोपांचे रोपण केले. डोंगरावरील पठारावर साहित्य वाहून नेणे हे श्रमाचे काम होते. परंतु कल्याण आश्रमाचे 22 कार्यकर्ते, माळीण परिसरातील आरोग्यरक्षक, गो-ग्रीन संस्थेचे सदस्य, आंबेगाव तालुक्यातील पंढरीनाथ विद्यालयाचे 50 विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून ते पार पडले.