नवी दिल्ली – भारतात आयपीओच्या माध्यमातून भांडवल उभारणी करण्याचा सपाटा नव्या कंपन्यांनी सुरू ठेवला आहे. डिसेंबर महिन्यात तब्बल 10 आयपीओ ग्राहकांना उपलब्ध होणार असून या माध्यमातून कंपन्या 10 हजार कोटी रुपये उभे करणार आहेत.
यासंदर्भात इन्व्हेस्टमेंट बॅंकरनी सांगितले की, बऱ्याच नव्या कंपन्यांना त्यांच्यावरील कर्जाचा भार कमी करायचा आहे. विस्तारीकरणाच्या योजना राबविल्या आहेत. त्यामुळे आयपीओ बाजारात येत आहेत. लर्नऍप डॉट कॉम चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिक सिन्हा यांनी सांगितले की, जेव्हा शेअर बाजारात तेजीचा काळ असतो त्या काळामध्ये आयपीओ जास्त प्रमाणात येत असतात. दोन महिन्यापूर्वी भारतीय शेअर बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी होती. त्यामुळे हे आयपीओ आले आहेत. दरम्यानच्या काळामध्ये महागाई आणि नव्या करोनामुळे काही प्रमाणात संदिग्ध परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र भारतामध्ये रिटेल गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात आले आहेत.
त्यांना नव्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतात गेल्या काही वर्षांमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या वाढल्या आहेत. या कंपन्यांनी आतापर्यंत आयपीओ बाजारात येणे टाळले होते. मात्र आता त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे आगामी काळात तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आयपीओ जारी करण्याची शक्यता आहे.
2021 मध्ये 51 कंपन्यांचे आयपीओ बाजारात आले. या कंपन्यानी एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम ऊभी केली आहे. अगोदर 2017 मध्ये कंपन्यांनी आयपीओ जास्त प्रमाणात आणले होते. शेअर बाजारात तेजी असल्यामुळे सरकारही काही सरकारी कंपन्यांची निर्गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहे.