– केंद्रीय हवामान विभागाकडून प्रयोगासाठी हालचाली गतिमान
– उस्मानाबाद, लातूर आणि पुणे जिल्ह्यालासुद्धा होणार लाभ
सोलापूर – सोलापूर जिल्ह्यासह राज्यात पावसाने ओढ दिल्याने बळीराजांवर कमालीचे संकट ओढवले आहे. खरिपाच्या पेरण्यांना मोठा ब्रेक लागल्याने आणि अद्यापही पावसाळा सुरु होऊनदेखील पाण्याचे टॅंकर सुरूच असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. पावसाने पाठ फिरविल्याने आता शासनाने कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत.
सोलापूरसह औरंगाबाद आणि नगर या तीन ठिकाणी कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार आहे. या पावसाचे निरीक्षण करण्यासाठी केंद्रीय हवामान विभागाकडून एक पथक सोलापुरात दाखल झाले आहे. केगाव येथील सिंहगड कॉलेजच्या इमारतीवर रडार यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. सोलापूर विमानतळावर विमाने दाखल झाली असून ज्यामध्ये सिंहगड संस्थेच्या दोन खासगी विमानांचा समावेश आहे.
सोलापुरात कृत्रिम पावसाचा प्रयोग झाल्यास सोलापूर नजीकच्या उस्मानाबाद, लातूर आणि पुणे जिल्ह्यालासुद्धा याचा लाभ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. कृत्रिम पावसाचे प्रयोग यशस्वी करण्यासाठी सर्वप्रथम हवामानाचा अंदाज घेतला जातो. हा प्रयोग खूपच खर्चिक असल्याने शासकीय पातळीवर याची खूपच काळजी घेतली जाते.
दरम्यान, केंद्रीय पथकाकडून या विमानांद्वारे ढगांचा अंदाज घेतला जाणार आहे. त्यानंतरच प्रयोगाला सुरुवात करण्यात येणार आहे. सोलापूर विमानतळावर कृत्रिम पावसाला आवश्यक असलेली मशिनरी इन्स्टोलिंग करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.