विमानतळ पर्यावरण व्यवस्थापन समितीची बैठक
ग्रामस्थांना विश्वासात घेऊन काम करा
शिर्डी (प्रतिनिधी) – विमानतळ परिसरात जमा होणाऱ्या पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर करता यावा, यासाठी विमानतळ प्राधिकरणाने रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभारुन पाण्याचे नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केली.
शिर्डी येथील विमानतळ व परिसर व्यवस्थापनासाठी पर्यावरण व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक आज पार पडली. यात जिल्हाधिकारी द्विवेदी बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, विमानतळ संचालक दीपक शास्त्री, विमानतळ मुख्य सुरक्षा अधिकारी दिनेश दहीवडकर, सुरक्षा अधिकारी पंढरीनाथ शेळके, राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे उपस्थित होते.
विमानतळाचा मुख्य भाग व परिसरामध्ये विविधप्रकारची कार्ये निरंतर पार पाडण्यात येतात. ही सर्व कार्ये सुलभपणे पार पाडता यावीत, यासाठी या कार्यात विमानतळ प्रशासनाने स्थानिकांना सहभागी करुन घ्यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी केली. परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी खासगी संस्था नेमण्यात यावी, असेही ते म्हणाले. विमानतळ परिसरातील कचरा संकलन व त्याची विल्हेवाट त्यामध्ये ग्रामपंचायतीचा सहभाग, तसेच विमानतळ परिसरात उडणाऱ्या पक्ष्यांवर नियंत्रण ठेवणे, जंगली श्वापदांचा बंदोबस्त करणे इत्यादी विषयांवर विमानतळ संचालक दीपक शास्त्री यांनी प्राधिकरणाने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.
आजूबाजच्या शेतकऱ्यांकडून शेतीची कामे करताना विमानतळ प्रशासनास होणाऱ्या गैरसोयीबद्दल स्थानिकांशी चर्चा करुन मार्ग काढण्यात येईल, असे ते म्हणाले. विमानतळ परिसर व्यवस्थापन सुकर व्हावे, यासाठी नगरपंचायत आणि जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बैठकीला विमानतळ उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, टर्मिनल व्यवस्थापक एस. मुरलीकृष्ण, मुख्य विद्युत अभियंता अजय देसाई, मुख्य स्थापत्य अभियंता कौस्तुभ ससाणे, एअरपोर्ट मॅनेजर रोहित रेहपाडे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. अजयनाथ थोरे, अशोक मौर्य, आशिष अब्राहम, सचिन होडगर, डॉ. विजय नरोडे आदी उपस्थित होते.