जामखेड – शांतता समितीच्या बैठकीत गणेशोत्सवापूर्वी शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवण्यात येतील, असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र, राजकारण्यांप्रमाणेच प्रशासकीय राजवटीत अधिकाऱ्यांकडून दिली जाणारी आश्वासनेदेखील वांझोटी ठरत आहेत. कारण 31 ऑगस्टला बाप्पाची स्थापना झाली, तरी मिरवणूक मार्गावरील एकही खड्डा प्रशासनाने बुजवला नाही. परिणामी यंदादेखील बाप्पाचे आगमन खड्डेमय रस्त्यांवरून झाले आहे .
शहरातील रस्त्यांची झालेली दैन्यावस्था आता शहरवासीयांसाठी नवी बाब राहिलेली नाही. शहरातून जाणाऱ्या नगर-बीड रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग असलेल्या बीड ते नगर रस्त्याची चाळणी झाल्याने हा रस्ता डांबराचा आहे की केवळ मुरूम अंथरलेला, असा प्रश्न सध्या प्रवाशांना पडत आहे. जवळपास आठ ते नऊ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. वारंवार दुरुस्ती केली जाते.
मात्र. रस्ता अजूनही खराबच आहे. रस्त्याने चालताना नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. वाहनधारकांना वाहन चालवणे हे सर्कसप्रमाणे बिकट झाले आहे. प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी या रस्त्याची दुरुस्ती केली असतानाही पावसाळ्यात पहिल्याच पावसात दुरुस्त केलेल्या रस्त्यावरील डांबर वाहून गेले असून, रस्त्यावर चिखलाचे ढिगारे जमा झाले आहेत गणेशोत्सवाला सुरूवात होण्यापूर्वीच शहरातील रस्त्यांची डागडुजी व इतर कामांना प्रशासनाने प्राधान्य देणे गरजेचे होते, मात्र तसे झाले नाही.
खड्ड्यांचे साम्राज्य असलेल्या शहरातील बहुतांश रस्त्यांवरून बुधवारी गणपती बाप्पांचे आगमन झाले. अधिकाऱ्यांना कामाचा विसर पडला असल्यामुळे घरोघरी आणि मंडळांच्या ठिकाणी बाप्पाला ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत नेणाऱ्या गणेशभक्तांची कोंडी झालेली पहावयास मिळाली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बाजारपेठेतून बाप्पाची मूर्ती खरेदी घेऊन जाणाऱ्या गणेशभक्तांना खड्ड्यांचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. पावसाळा सुरू झाल्यानंतर शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे प्रशासनाला दिसले नाहीत का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या खड्ड्यांमुळे बाप्पाच्या आगमनाचा मार्ग खडतर व खड्डेमय असल्याची स्थिती आहे. आता विसर्जन मिरवणुकी मार्गावरून जाताना तुट फूट व श्रींच्या मूर्तीची विटंबना झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रशासनाची आश्वासने वांझोटीच!
गणेशोत्सवाआधी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत शहरातील शेकडो कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवापूर्वी मिरवणूक मार्ग व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजवावे, अशी मागणी केली होती. या वेळी प्रशासनाने गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवू, असे आश्वासन दिले होते. मात्र, प्रशासनाने खड्डे बुजवले नाही. राजकारण्यांप्रमाणेच प्रशासकीय राजवटीत अधिकाऱ्यांकडून दिली जाणारी आश्वासनेदेखील वांझोटी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.
कर्जत फाटा ते सौताडा या रस्त्याच्या सिमेंट-कॉंक्रिटीकरणाच्या कामाला मंजुरी मिळाली असून, निविदा काढून संबंधित ठेकेदारांकडून कागदपत्रांची पूर्तता करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत नगर रोड ते बीड रोडवरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात होईल.
संतोष काळे, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग