कोलकता – भारत आणि इंग्लंडदरम्यानची पहिली दिवसरात्र कसोटी (डे-नाईट टेस्टमॅच) आगामी वर्षात अहमदाबाद येथे होईल, अशी माहिती भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी दिली आहे. त्यामुळे या दोन देशांदरम्यान पहिली “पिंक बॉल टेस्ट’ कोठे होणार याविषयीची अनिश्चितता संपली आहे. या कालावधीत पाच कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
आगामी वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडचा संघ जानेवारी ते मार्च महिन्यांदरम्यान भारत भेटीवर येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गांगुली यांच्या विधानाला महत्त्व आहे. कोलकता प्रेस क्लबच्या एका कार्यक्रमात गांगुली यांनी ही घोषणा केली आहे.
वास्तविक कोव्हिड19 च्या उद्रेकामुळे ही उभय देशांतील मालिका, सध्या सुरु असलेल्या आयपीएलप्रमाणे, संयुक्त अरब अमिरातीत खेळवली जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, गांगुली यांच्या आजच्या विधानामुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे.
गांगुली म्हणाले की, इंग्लंड दौऱ्यातील कसोटीची अन्य ठिकाणे अद्याप ठरवली जात असून, त्यानंतर संघनिवडीचा प्रश्न चर्चेला येईल. मात्र, त्यापूर्वी भारताला ऑस्ट्रेलिया दौरा करायचा असल्याने क्रिकेट मंडळाने त्यावरच आपले लक्ष केंद्रित करायचे ठरवले आहे.