मुंबई – “संजय राऊत जेव्हा बोलतात तेव्हा मला एका गाण्याची आठवण येते पिंजरे मै पोपट बोले”, अशा शब्दात शिंदे गटाकडून राऊत यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. पत्राचाळ प्रकरणात जामीन मंजूर होताच राऊत जेलमधून बाहेत आले आणि त्यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करायला सुरुवात केली. माध्यमांसमोर येऊन राऊत रोज कोणत्याना कोणत्या कारणावरून शिंदे गटावर किंवा भाजपवर टीका करताना दिसून येतात. राऊतांच्या याच सवयीवरून आता ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
नरेश म्हस्के म्हणतात,संजय राऊत जेव्हा बोलतात तेव्हा मला एका गाण्याची आठवण येते, पिंजरे मै पोपट बोले. कुडबुड्या ज्योतिषाने कार्ड ठेवलेले असतात. ते कार्ड उचलतो आणि जे बोलायचंय ते बोलतो. याच पद्धतीने राऊत साहेब रोज सकाळी उठतात आणि ठेवलेल्या ४० कार्ड पैकी एक कार्ड उचलतात आणि बोलायला सुरुवात करतात. अशा शब्दात म्हस्के यांनी राऊतांवर टीका केली आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हस्के यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले.तुमच्यात हिंमत असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या आणि रिंगणात उतरा,उगाच तोंडाची हवा घालवू नका असा टोला देखील यावेळी म्हसकेंनी लगावला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर नरेश म्हस्के हे शिंदे गटात सामील झाले आहेत.