मोहन जोशी : पाणीकपातीला भाजप जबाबदार असल्याचा आरोप
पुणे – पाणीकपातीच्या संकटाला सर्वस्वी पालकमंत्री गिरीश बापट जबाबदार आहेत, या केलेल्या टीकेला “अदखलपात्र’ असे उत्तर देऊन बापट यांनी बगल दिल्याचा आरोप माजी आमदार आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार मोहन जोशी यांनी केला आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असताना त्याचे योग्य नियोजन पालकमंत्री या नात्याने बापट यांनी केले नाही. त्यामुळेच पुणेकरांना दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे, अशी टीका मी केली होती. मात्र त्याचे उत्तर देण्याऐवजी बापट यांनी “अदखलपात्र’ अशी त्याची संभावना केली. तसे करून बापटांनी पुणेकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केल्याचे जोशी यांचे म्हणणे आहे.
पालकमंत्र्यांच्या या उत्तरामुळे मात्र पुणेकर जनताच बापटांना 23 मे रोजी म्हणजेच लोकसभा निवडणुकीचा निकालाच्या दिवशी अदखलपात्र करेल, अशी टीकाही जोशी यांनी केली. गिरीश बापट हे पुण्याचे पालकमंत्री आहेत; “मालकमंत्री’ नाहीत अशी उपरोधिक टीकाही जोशी यांनी केली. कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राजवटीत पुणेकरांना पाण्याचा प्रश्न भेडसावला नाही कारण आम्ही पुणेकरांचे हित साधण्यासाठी पाण्याचे नियोजन केले. बापट यांनी मात्र ग्रामीण भागात भाजपला मते मिळतील या आशेने पुणेकरांना वेठीला धरून पुण्याच्या पाणीपुरवठ्याच्या नियोजनाचा बट्याबोळ केला; त्यामुळेच पुणेकरांना ऐन उन्हाळ्यात पाण्याच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे, असे जोशी म्हणाले.