पिंपरी – गेले दिड वर्ष लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडणे कठीण झाले होते. आता परिस्थिती काहीशी पूर्वपदावर आली असली तरी करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे लागत आहे. यामुळे शहरवासिय पर्यटनाकरिता आता ग्रामीण भागाकडे वळू लागले आहेत. दवभरल्या थंडी सोबत शेतातला हुरडा, चुलीवरचे जेवण, ताजा भाजीपाला आणि फळांचा आस्वाद घेण्यासाठी नवीन वर्षाच्या सुरवातीलाच शहरवासीयांची पावले आता ग्रामीण भागाकडे वळू लागली आहेत.
करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी झालेल्या लॉकडाउनच्या काळात शहरी भागातील लोकांवर घरातच बसून राहण्याची वेळ आली होती. त्यातच सणासुदीला, लग्नकार्याला व काही कौटुंबिक कार्यक्रमांसाठीही प्रतिबंध होता. अशा बंदिस्त वातावरणामुळे प्रामुख्याने गृहिणी, नोकरदार, व्यावसायिक, महिला आणि बच्चेकंपनीला तब्बल दिड वर्षे चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. शाळा बंद व बाहेर खेळायलाही बंदी, यामुळे बच्चे कंपनीही चांगलीच हिरमुसली होती. एकंदरीत सर्वांच्या आनंदावर विरजण पडले होते. अशावेळी परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने घराबाहेर पडण्याची संधी अनेकजण घेऊ लागले आहेत. नववर्षाचे निमित्त, वाढलेली थंडी यामुळे हुरडा पार्ट्यांसाठी अनेकांची पावले ग्रामीण भागाकडे वळली आहेत.
करोनामुळे धास्तावलेल्या सर्वसामान्य आर्थिक बजेटचा विचार करून तसेच संसर्गाचा धोका टाळण्यासाठी कमी गर्दी असलेल्या ग्रामीण पर्यटनाची वाट धरत आहेत. याचा फायदा ग्रामीण भागातील काही सधन शेतकऱ्यांनी घेतला आहे. ग्रामीण भागात हुरडा पार्टीच्या नावाखाली संपूर्ण कुटुंबासाठी पॅकेजची घोषणा केली आहे. चुलीवरचे जेवण, हुरडा पार्टी, संत्रा, मोसंबी, पेरु, गाजर फळांचा आनंद घेऊन शेतकऱ्यांसोबत बैलगाडीतून फेरफटका, निसर्गाच्या सानिध्यात रमण्याची संधी उपलब्ध करून देत आहेत, बच्चेकंपनी आनंदाने खेळू बागडू लागली आहेत.
आगळा वेगळा आनंद
शेतात चुलीवर तयार केलेले भोजन, फळांनी भरलेली शेती, उंच टेकडीवर असलेली पुरातन मंदिरे, नदी, नाले, ओढे, तलाव, पशुपक्षी व येथील लोकांमध्ये असलेली आदर सन्मानाची भावना, यामुळे दोन-तीन दिवस वास्तव्य असतानाही शहरी भागापेक्षा गामीण भागात आगळावेगळा आनंद मिळत असल्याचे नागरिक सांगत आहेत.