पिंपरी – करोनाकाळात जेव्हा जगभरात सर्वच उद्योग क्षेत्रांवर विपरीत परिणाम होत होते आणि अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. भविष्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच आयटी क्षेत्रातील बड्या कंपन्यांनी येत्या काळात मोठ्या प्रमाणात रोजगार देणार असल्याच्या घोषणा केल्या. परंतु अजूनही घोषणांप्रमाणे नियुक्त्या होत नसल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी-चिंचवड आणि पुणे ही शहरे जगभरातील प्रमुख आयटी हबपैकी एक आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये देशातील सर्व बड्या आयटी कंपन्यां आहेत. तसेच अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये देखील आहेत. शेकडो लहान-मोठ्या आयटी कंपन्या लाखो आयटीयन्सला येथे रोजगार मिळतो.
करोनाकाळातील कडक लॉकडाऊनमध्ये देखील आयटी कंपन्या जोमाने काम करत होत्या. त्यातच आंतरराष्ट्रीय सर्व्हे रिपोर्ट लाखों लोकांचे रोजगार जाणार असल्याच्या भाकिते करत होते. त्याच काळात भारतातील चार टॉप आयटी कंपन्यांनी आपण एक लाखांहून अधिक आयटीयन्सला येत्या काळात नोकऱ्या देणार असल्याची घोषणा केली. तसेच भारतात कार्यालये असलेल्या बहुराष्ट्रीय आयटी कंपन्यांनी देखील अशाच प्रकारची घोषणा करत अर्थव्यवस्थेतील मरगळ दूर केली.
या सर्व घोषणा पाहता दोन ते तीन लाख आयटीयन्सला नोकरी मिळण्याची शक्यता निर्माण झाली. त्यात 75 टक्के अनुभवी आणि 25 टक्के नवीन आयटीयन्सला नोकरी मिळणार होती. या घोषणांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या आयटी क्षेत्रात चैतन्य पसरले. मध्यंतरीच्या काळात जावा डेव्हलपर्स सारख्या आयटीयन्सची मागणीही वाढली. त्यांना पगारात मोठी वाढही मिळू लागली. हे दृश्य पाहता आयटी कंपन्यांच्या घोषणा खऱ्या होण्याच्या शक्यतांना आणखीनच बळ मिळाले. परंतु सप्टेंबर महिना उजाडला तरी अजूनही तशा नियुक्त्या होताना दिसत नाहीत. शहरातील आणि बाहेरुन शहरात येऊन थांबलेल्यांची प्रतीक्षा वाढतच चालली आहे.
हा खटाटोप कशासाठी?
आयटी कंपन्यांनी जाहीर केलेले आकडे पाहता रोज किमान तीनशे आयटीयन्स नोकरी मिळणे अपेक्षित होते. तीनशे लोकांची भरती करण्यासाठी रोज किमान नऊशे मुलाखती व्हायला हव्या होत्या. परंतु तसे होताना दिसत नसल्याचे आयटीयन्स सांगत आहेत. मग कंपन्यांनी घोषणांचा खटाटोप कशासाठी केला असा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारकडून मिळणाऱ्या विविध सवलतींसाठी अशा घोषणा केल्या असल्याची शक्यता आयटीयन्स व्यक्त करत आहेत.
नवीन रोजगार की केवळ नोकरीत बदल?
मोठ्या प्रमाणात अनुभवी आयटीयन्सची गरज असल्याचे सांगण्यात आले होते. यामुळे अशाही शक्यता व्यक्त केल्या जात आहेत की त्याच मोजक्या कंपन्यांतून आयटीयन्स केवळ कंपन्या बदलल्या असाव्यात. असे झाल्यास सध्या काम करत असलेल्या आयटीयन्सला चांगली पगार वाढ मिळेल परंतु नवीन तरुणांचे काय आणि नोकरी गमावून घरी बसलेल्या आयटीयन्सचे काय असे प्रश्न आयटीयन्ससाठी कार्यरत असलेल्या संघटना उपस्थित करत आहेत.
देशातील टॉप चार कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात भरतीची घोषणा केली होती. रोज किमान तीनशे आयटीयन्सला नोकरी मिळायला हवी होती. परंतु तसे होतना दिसत नाही. अनेक आयटीयन्स अजूनही बेरोजगार आहेत. कंपन्यांनी केवळ सरकारी सवलतींसाठी या घोषणा केल्या होत्या का? अशी शंका उपस्थित होत आहे.
– हरप्रीत सलूजा, अध्यक्ष, नॅसेन्ट इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी एम्प्लॉइज सिनेट