कामशेत : दरवर्षीपेक्षा मावळ तालुक्यात यंदा उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. त्यामुळे पाण्याचे होणारे बाष्पीभवन देखील वेगाने होत आहे. याचा परिणामा पाणी पातळीवर होत असून तालुक्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे.
सद्यस्थितीत पवना धरणात ३७ टक्के, वाडीवळे धरणात ४० टक्के तर आंद्रा धरणात ४० टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. एप्रिल महिना संपत आला असून अद्याप संपूर्ण मे महिना आणि जूनचे काही दिवस उन्हाचे बाकी आहेत. असे असताना पाणीसाठ्यात झालेली घट सर्वांचीच चिंता वाढवणारी आहे. प्रत्येक नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पवना धरणातील मावळातील अनेक उद्योगांना, गावखेड्यांना तसेच पिंपरी-चिंचवड सारख्या महानगराला पाणीसाठा होतो. तर, आंद्रा धरणातून देखील पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय पवना आणि आंद्रा धरणावर तालुक्यातील अनेक गावच्या पाणीयोजना अवलंबून आहे. अशात उन्हाळ्याचा एक महिना बाकी असताना सर्वांनीच पाणी जपून वापरण्याची गरज आहे.
पवना धरण हे मावळ तालुक्यातील सर्वात मोठे असून सध्या पवना धरणात ३७ टक्के पाणीसाठा शि्लक आहे. पिंपरी -चिचवड आणि मावळातील गावांसाठी गेल्या दोन दिवसांपासून एक हजार क्यूसेकने पाणी सोडले आहे. उन्हामुळे बाष्पीभवन वाढून धरणातील जलसाठा कमी होऊ लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे
– रजनीश बारिया, शाखा अभियंता, पवना धरण
वाडीवळे धरणातून वडगाव मावळ, इंदुरी, कामशेत, टाकवे आदी गावांसह जवळपास पंधरा ग्रामपंचायती, टाकवे औद्योगिक वसाहत आणि अकराशे हेक्टर शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. सध्या आंद्रा धरणात ४० टक्के पाणीसाठा आहे. आंद्रा धरणातील जलसाठ्यावर अलंबून असणाऱ्या नागरिकांनी पाणी जपून वापरावे.
– संतोष शिंदे, अभियंता, वाडीवळे धरण