भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांची राज्य सरकारवर टीका
पिंपरी – भाजपच्या काळात राज्यात कधीही भारनियमन झाले नव्हते. मात्र महाआघाडीच्या नियोजनशून्य कारभारामुळे राज्यावर भारनियमनाची वेळ आली आहे, अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
राज्यातील भारनियमनाच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहर भाजपाच्यावतीने रविवारी (दि. 24) कंदील मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, नामदेव ढाके यांच्यासह भाजपचे माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. लांडगे म्हणाले, हे सरकार गोरगरिबांकरिता काम करणारे नाही.
सरकारच्या नियोजनशून्य कारभाराचा त्रास नागरिकाना सहन करावा लागत आहे. आताच राज्य करोनाच्या संकटातून बाहेर पडले आहे तर सरकारच्या भारनियमनामुळे उद्योजक पुन्हा अडचणीत आले आहेत. याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. जर लाईटच नसेल तर पाणी वरच्या टाकीत कसे चढावायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान भाजपचा मोर्चा हा महावितरणच्या अजमेरा कॉलनीतील कार्यालयात नेण्यात येणार होता. मात्र रविवारी कार्यालय बंद असल्याने हा मोर्चा अजमेराकडे जाणाऱ्या चौकातच समाप्त करण्यात आला.