- पंधरा दिवस चालणार अभियान : करोनामुळे इतर आजारांकडे झाले होते दुर्लक्ष
पिंपरी – कुष्ठरोग व क्षयरोग (टीबी) या आजाराबाबत अनेकजण अनभिज्ञ असतात. त्यामुळे यावर अनेकजण वेळेत उपचार घेत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन शासनाने दिलेल्या निर्देशानुसार शहरात 15 दिवसांचे अभियान चालवले जाणार आहे. यामध्ये 25 लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी केली जाणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने 1 ते 16 डिसेंबर या कालावधीत शहरात कुष्ठरोग व क्षयरोगी शोधण्यात येणार आहेत. राज्यातील कोविड 19 च्या आपत्कालिन परिस्थितीमुळे कुष्ठरोग व क्षयरोग असलेल्या रुग्णांचे निदान व औषधोपचाराखाली आणण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या संदर्भात आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने रुग्णांच्या लवकर निदानासाठी उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.
रोगशास्त्रीय अभ्यासानुसार दोन्ही आजारांचे निदान व औषधोपचार वेळेत होणे आवश्यक आहे. वेळेत उपचार न झाल्यास गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होते. तसेच इतरांना या रोगाची लागण होण्याची साखळी अखंडित राहते. त्यासाठी समाजातील कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णांचा शोध घेवून निदान करणे व औषधोपचार सुरू करणे आवश्यक आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनेही शहरात हे शोध अभियान राबविण्यात येणार आहे. शहरातील प्रत्येक घराचे सर्वेक्षण करून रुग्णांचा शोध घेण्यात येणार आहे. या शोध मोहिमेसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे, कुष्ठरोग अधिकारी डॉ. साबळे यांचे पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. या पथकाच्या मार्गदर्शनाखाली सर्व वैद्यकीय अधिकारी, एएनएम, आशा कार्यकर्ता व मोहिमेअंतर्गत नियुक्त स्वंयसेवक यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचारी व स्वंयसेवक यांना सहकार्य करण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे.
क्षयरोगाची लक्षणे
दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला, ताण येणे, वजनात घट होणे, थुंकीवाटे रक्तजाणे, मानेवर गाठ असणे अशी लक्षणे आढळून आल्यास संशयित म्हणून नोंद घेऊन पुढे थुंकी नमुन्याची तपासणी एक्सरे व सीबीनॅट तपासणी मोफत केली जाणार आहे.
कुष्ठरोगाची लक्षणे
अंगावर चट्टे, हातापायाला मुंग्या येणे, स्नायूमध्ये अशक्तपणा येणे, बधीरता येणे, भुवयाचे केस विरळ होणे, चेहरा तेलकट होणे, तळहात-तळपायात बधीरता जाणवणे अशी लक्षणे असणाऱ्यांची पुन्हा एकदा शास्त्रोक्त तपासणी करून त्यांच्यावर मोफत औषधोपचार केले जाणार आहेत.