पिंपरी : जगभरातून पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी येत असतात. मात्र, दहशतवाद्यांकडून पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ आहे. विविध उद्योग काश्मीरमध्ये येत असल्याने हा हल्ला करण्यात आला आहे. हे दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमधून येत असल्याने दहशतवाद्यांचा कायमचा नायनाट करायचा, असेल तर पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्यावा, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
पिंपरी-काळेवाडी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री आठवले म्हणाले की, दहशतवाद्यांनी या आगोदर भारतीय सैन्य, काश्मिरी पंडित यांच्यावर हल्ले केले आहेत, मात्र आता त्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले. त्यामध्ये २८ पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यातील एका स्थानिक मुस्लिम घोडेस्वार व्यावसायिक तरुणाने दहशतवाद्यांना प्रतिकार केला असता, दहशतवाद्यांनी त्यालाही मारले. दहशतवाद्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी भारतील लष्कराशी भिडावे.
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत ठोस भूमिका घेणार का, या प्रश्नावर आठवले म्हणाले की, आमचे सरकार पाकिस्तानबरोबर युद्ध करण्याचा विचार करीत नाही. मात्र, केंद्र सरकारकडून इतर मार्गाने पाकिस्तानला धडा शिकविला जात आहे, असेही त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्याबाबत आठवले म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने २८८ पैकी २६७ जागा महायुतीला दिल्या आहेत. महाविकास आघाडीला फक्त ४६ जागा मिळाल्या. मात्र, राहुल गांधी अमेरिकेत जाऊन महाराष्ट्रातील निवडणुकीबाबत भाष्य करीत आहेत. असाही टोला त्यांनी लगावला.