पिंपरी : गुलेन बॅरे सिंड्रोमचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली असून दूषित पाणी वापरून बॉटलिंग करणार्या अनधिकृत खाजगी आरओ प्लांट्स चालकांना प्लांट तात्काळ बंद करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. शिवाय पाण्याची गुणवत्ता आणि बॉटलिंग प्रक्रियेचा सखोल आढावा व मूल्यांकन केल्यानंतरच त्यांना पुन्हा प्लांट चालू करण्याची परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
दूषित भूजलाचा पिण्याच्या पाण्यासाठी वापर केल्याने जीबीएसचा प्रादूर्भाव वाढू शकतो. आर.ओ प्लॉन्ट्स बहुतेक वेळा परवाना किंवा सुरक्षिततेच्या निकषांचे पालन न करता पाणी पुरवत असल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांसाठी सुरक्षित व स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत.
पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, प्लंबर आणि सुरक्षा रक्षक यांच्या समन्वयाने तसेच आरोग्य वैद्यकीय विभागाकडून परवान्याबाबत तपासणी करूनच या प्लांट्सच्या बंदीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शिवाय आर.ओ प्रकल्प (प्लांट) बंद बाबतच्या आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर वैद्यकीय विभागामार्फत कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
आर.ओ प्लांट अनिश्चित काळासाठी राहणार बंद
महापालिकेच्या वतीने खासगी आरओ प्लांट्सच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये अनधिकृत खाजगी आरो वॉटर ऑपरेटर्स दूषित पाणी वापरून पाण्याची बॉटलिंग करुन पुरवठा करत असल्याचे निदर्शनास आले होते. असे दूषित पाणी प्रामुख्याने बोअरवेल्स व उघड्या जलस्त्रोतांमध्ये आढळते. यामुळे हे प्लांट बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जीबीएसच्या पार्श्वभूमीवर आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने शहरातील नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित पाणी मिळावे, यासाठी अनधिकृतपणे दूषित पाण्याची बॉटलिंग करणार्या आरओ प्लांट्सवर कठोर कारवाई केली जात आहे. पाणी हे आरोग्याचा मूलभूत घटक असल्याने त्याच्या गुणवत्तेचा सखोल आढावा घेतल्यानंतरच संबंधित प्लांट्सना परवानगी देण्यात येणार आहे.
– प्रमोद ओंभासे,
मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग