तीन ते चार महिन्यांपासून वेतन थकीत : महिनाभरात दुसऱ्यांदा नामुष्की
पिंपरी – कामगार दिनी मेट्रोच्या ठेकेदारांच्या कामगारांनी उपोषण सुरू केले होते. तेव्हा राजकीय मंडळी आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने हे आंदोलन थांबवण्यात आले होते. एका महिन्यात पुन्हा एकदा कामगार उपोषणावर बसले आहेत. एकीकडे डिसेंबरपर्यंत मेट्रोला प्रायोरिटी रुटवरील काम पूर्ण करायचे आहे आणि दुसरीकडे वारं-वार ठेकेदार कंपन्यांचे कामगार आंदोलन करत आहेत.
पुणे मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत एच.सी.सी अल्फ्रा इन्फ्रा प्रोजेक्टस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत कार्यरत असणाऱ्या 50 कामगारांचे गेल्या तीन ते चार महिन्यापासून वेतन थकीत असल्याने मेट्रो कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कामगार उपोषणास बसले आहेत. थकित वेतन लवकरात-लवकर देण्याची मागणी कामगारांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या दरम्यान मेट्रो स्टेशनचे काम सुरु असून ते काम एच.सी.सी अल्फ्रा इन्फ्रा कंपनीला मेट्रोने दिले आहे. या कंपनीत देशभरातील विविध राज्यातून आलेले कामगार काम करतात. परंतु, या कंपनीने कामगारांचा गैरफायदा घेऊन पगार थकविले आहेत. तसेच, काही कामगारांनी पगाराबाबत विचारणा केल्यास कामावरुन काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.
डिसेंबर 2018 पासून काही कामगारांचे पगार थकीत असल्याने दोन महिन्यापूर्वीच कामगारांनी उपोषण केले होते. उपोषणस्थळी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर अनिल बिराजदार यांनी भेट देऊन 31 मे पर्यत सर्व थकीत कामगारांचे पगार जमा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही सर्व कामगारांचे पगार जमा केले नाहीत. 17 मे रोजी 35 लाख 59 हजार 884 रुपये कंपनीने कामगारांना देऊ केले होते. मात्र, अद्यापही 90 लाख 48 हजार 530 रुपये येणे बाकी असल्याने कामगार हवालदिल झाले आहेत.
उपोषणस्थळी आलेले मारुती भापकर म्हणाले, दोन दिवस उपोषण करुनही दखल न घेतल्यास सोमवारी कंपनीचे ठेकेदार व महामेट्रो यांच्याविरोधात पिंपरी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कंपनी कामगारांना कष्टाचे पैसे देत नसल्याने कामगारांची उपासमार होत आहे. तसेच, कंपनीतील काही कामगारांना कंपनीने जबरदस्तीने निलंबित केले आहे. या विरोधात लढा देणार आहे.
ठेकेदार कंपनीचा भोंगळ कारभार
एच.सी.सी अल्फ्रा इन्फ्रा प्रोजेक्टस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत गेल्या एक ते दीड वर्षापासून अनेक कामगार कार्यरत आहेत. या कंपनीत वेळेवर पगार दिला जात नसल्याने अनेकांनी राजीनामे दिले आहेत. मात्र, राजीनामा दिल्यानंतर त्या कामगारांचा पी.एफ जमा करणे बंधनकारक आहे. मात्र, कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे ती सोडून जातानाही पी.एफ जमा करत नसल्याने कंपनी मनमानी कारभार करत असल्याचे दिसून आले आहे. वेतन थकविण्याबरोबर पीएफही दिला नसल्याने कामगारांच्यात कंपनीच्या व्यवस्थापनाबद्दल असंतोष पसरला आहे. असाच प्रकार पूर्वीपण घडला होता, त्यावेळी राजकीय मंडळी व मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करुन वेतन मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता.