निगडी – यमुनानगरमधील मुख्य रस्त्यावरील पदपथ पेव्हिंग ब्लॉक बदलण्याच्या कामासाठी उखडून टाकले. मात्र, दोन महिने उलटूनही ब्लॉक न बसविल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
महापालिकेच्या स्थापत्य विभागाने हत्ती चौकापासून ते बजाज ऑटो कंपनीच्या गेटपर्यंतच्या पदपथावरील पेव्हिंग ब्लॉक बदलायचे म्हणून काढून टाकले. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हे ब्लॉक काढून टाकण्यात आले. परंतु, ते अद्याप बसवले नाहीत. भूमिगत गटारांचे पाईप बदलून झाले, त्यासाठी केलेले खड्डे बुजवले, परंतु, रस्ता दुरुस्त केला नाही. त्यामुळे हमरस्त्याचे विद्रुपीकरण झाले आहे.
ब्लॉक काढून टाकलेले पदपथ अपघाती झाले आहेत. राडारोड्यामुळे वाहने घसरत आहेत. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत. पावसाळ्यापूर्वी पदपथावर ब्लॉक बसविणे गरजेचे आहे. अन्यथा पदपथाची अवस्था अधिक भयानक होऊ शकते.
संपूर्ण शहरात अत्यंत बेजबाबदार आणि चुकीच्या पद्धतीने रस्त्यांची खोदाई सुरू आहे. शनिवारी खोदाईमुळे दोन दुर्घटना घडल्यानंतरही शहाणपण न घेतलेल्या प्रशासनाने या खोदकामाकडे दुर्लक्ष सुरूच ठेवले आहे. चांगल्या रस्त्यांची खोदाईमुळे दुरवस्था होत असून, अपघातही घडत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने अशा पद्धतीने सुरू असलेल्या खोदाई करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.