समस्यांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप
बोपखेल – लोकप्रतिनिधींच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ बोपखेल येथील माणिक पार्क रेसिडेन्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील रहिवाशांनी काळ्या फिती लावून मतदान केले.
नागरिकांच्या समस्या जाणून न घेता केवळ मत मागण्यासाठी येणाजया राजकीय मंडळीविरूद्धचा संताप बोपखेलवासियांनी काळ्या फिती लावून व्यक्त केला. राजकारण्यांचा निषेध नोंदवत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. गेल्या काही दिवसांपासून बोपखेलमधील रहिवाशांचे जीवन असह्य झाले आहे. नदीपात्रात जलपर्णी वाढल्याने मोठ्या प्रमाणावर डासांचा उपद्रव वाढला आहे. उन्हाळ्याचे दिवस, उकाडा वाढला आहे, त्यातच वीज पुरवठा खंडित होत आहे. डासांच्या उपद्रवाने नागरिक हैराण झाले असून त्यावर उपाययोजना करण्यास कोणीही पुढाकार घेतला नाही.
समस्या दिवसें-दिवस बिकट झाली आहे. त्यामुळे माणिक पार्कमधील रहिवाशांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवत मतदान केले. आज येथील रहिवाश्यांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी घेतलेली अनोख्या भूमिकेनंतर तरी येथील समस्या सोडविल्या जाणार का? याकडे लक्ष लागले आहे.