कामशेत – गतवर्षी काढणीला आलेले भातपीक अवकाळी पावसाने लोळविले. त्यामुळे मावळ तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला. अवकाळी पावसामुळे मावळातील भात उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून कृषी व महसूल विभागाने पिकांचे पंचनामे देखील केले मात्र त्या वेळी झालेल्या नुकसान भरपाई अद्याप देखील शेतकऱ्यांना मिळालेली नाही.
एप्रिल ते ऑक्टोबर 2017 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व अवेळी झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे, फळपिकांचे नुकसानीपोटी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी मावळ तालुक्याला जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्याकडून 16 लाख 31 रुपयांत 50 रुपये एवढे अनुदान प्राप्त झाले होते. मावळ तहसीलदार यांनी प्राप्त अनुदानापैकी मावळ तालुक्यातील एकूण 754 नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना 15 लाख 25 हजार 308 रुपये एवढे अनुदान नुकसान भरपाई म्हणून देण्यास मंजुरी दिली होती.
शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यांचे नुकसान भरपाई पैसे देण्याचे आदेश देखील वडगाव येथील युनियन बॅंकेस देण्यात आलेले आहेत. मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम का जमा झाली नाही, याची माहिती घेतली असता महसूल विभागाकडून बॅंकेस पाठविण्यात आलेली माहिती बॅंकेत दिसतच नव्हती यामुळे ही प्रक्रिया खोळंबली असल्याचे समजले.
त्यानंतर माहिती पाविणाऱ्याकडे पाठपुरावा करून बॅंकेस माहिती उपलब्ध करून दिल्यावर असे समोर आले की अनेक शेतकऱ्यांचे बॅंक खाते क्रमांक अर्धवट आणि चुकीचे असल्याचे आढळून आले. यामुळे एका तासात होणारे काम पुढील अनेक दिवस लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. यामुळे 2017 मधील पिकांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांना अजून वाट बघण्याची वेळ आलेली आहे. या संदर्भात महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता कृषी विभागाकडून आलेली माहिती आम्ही बॅंकेस दिली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
गतवर्षी भात कापणीच्या वेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. ऐन दिवाळीत कृषी विभागाने आणि विमा कंपनीने पंचनामे करून मावळातील नुकसानग्रस्त 2755 शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातून एकूण एक कोटी 86 लाखांची नुकसान भरपाई मिळून दिली आहे. याबद्दल त्यांचे कौतुक होत असले, तरी मागील वर्षीच्या ढिसाळपणामुळे शेतकऱ्यांना त्यांनी वाटच पाहायला लावले आहे.
“शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसंदर्भात मंडल कृषी अधिकाऱ्यांना व कृषी सहाय्यकांना सूचना देऊन सर्व शेतकऱ्यांची माहितीची पुन्हा तपासणी देऊन नवीन यादी मागविली आहे. यामुळे पुढील आठवड्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ मिळेल.
– देवेंद्र ढगे, तालुका कृषी अधिकारी, मावळ.
कृषी विभागाचे शेतकऱ्यांकडे बोट
कृषी विभागास विचारणा केल्यावर या सगळ्याचे खापर त्यांनी शेतकऱ्यांच्याच माथी फोडले की, शेतकऱ्यांनीच चुकीची माहिती दिली असावी, मात्र या सर्व प्रक्रियेत 2017 पासून कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांकडून त्यांच्या बॅंकेच्या खाते पुस्तकाची प्रत आणि अन्य माहिती तीन वेळा मागून घेतली होती आणि वेळोवेळी शेतकऱ्यांनी माहिती देऊन सुद्धा कृषी विभागाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी अजून काही काळ वाट पाहण्याची वेळ येणार आहे. बॅंक खाते पुस्तकाची प्रत देऊन सुद्धा शेतकऱ्यांचे खाते क्रमांक कृषी विभागाने कसे चुकविले यावरून कृषी विभागाचा गलथानपणा समोर येतो.