पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात राहणाऱ्या एका उच्चशिक्षित, श्रीमंत जोडप्याचा सुखी संसार सुरू होता. मात्र शाळेतील विद्यार्थ्यांचा व्हॉटस्ऍप ग्रुप सुरू झाला आणि पूर्वीचा प्रियकर तिच्या संपर्कात आला. पुन्हा एकदा प्रेमाच्या गप्पा अन् भेटीगाठी सुरू झाल्या. पत्नीचे बदलेले वागणे पतीच्या लक्षात आले आणि त्यांच्या सुखी संसारात मिठाचा खडा पडला.
“जाने मेरी जानेमन, बचपण का प्यार भूल नही जाना…’ हे लहान मुलाने म्हटलेले गाणे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. मात्र, शालेय जीवनात झालेले प्रेम लग्नानंतर पत्नीच्या जिवनात उफाळून आले. त्यातून त्यांच्या संसारात वादळ निर्माण झाले. 40 वर्षीय या दांपत्याला मुलेही आहेत. मनिष आणि मनिषा (काल्पनिक नावे) यांचेही शालेय जिवनामध्ये ऐकमेकांवर अपार प्रेम होते. त्यांनी लग्नाच्या आणाभाकाही घेतल्या होत्या. मात्र दोघांच्याही घरच्यांचा त्यांच्या या प्रेमाच्या संबंधास विरोध झाल्याने दुर्दैवाने त्यांचे एकमेकांशी लग्न झाले नाही. दोघेजण आपआपल्या सुखी संसारात रममाण झाले. ते एकमेकांच्या संपर्कातही नव्हते.
काही महिन्यांपूर्वी शाळेतील मित्र-मैत्रिणी एकत्र येत व्हॉटस्ऍप ग्रुप स्थापन केला. त्यातून पूर्वीचा प्रियकर मनिष आणि मनिषा हे दोघेही त्या ग्रुपमध्ये आले. त्यातून शालेय जिवनातील प्रेमाच्या आठवणी पुन्हा एकदा जागृत झाल्या. सुरूवातीला ग्रुपवर आणि नंतर वैयक्तिक चॅटींग सुरू झाले. हळुहळू ते दोघेही एकमेकांशी तास्नतास फोनवर बोलू लागले. याबाबत मनिषाच्या पतीला संशय आला. त्याने पत्नीचा फोन तपासाला असता त्यातून प्रेमाच्याही पुढे गेलेले धक्कादायक वास्तव समोर आले. त्याने पत्नीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्यातील वाद वाढत विकोपाला गेला.
अखेर पतीने मनिषा हिच्या विरोधात पोलिसांच्या महिला सहाय्य कक्षाकडे तक्रार केली. मनिषा हिने मनिष यांच्यासोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंध मान्य केले. मात्र त्याच्याशी बोलायचेच नाही, असे करण्यास नकार दिला. त्यांच्यासोबत कमी बोलण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. मात्र आपण पतीसोबतच राहणार असल्याचे ठामपणे सांगितले.
मनिषाचा प्रियकर मनिष यालाही पोलिसांनी बोलविले. ती बोलणार असेल तरच मीही तिच्याशी बोलेल. माझी पत्नी मला सोडून गेली आहे, त्यामुळे तिला जर माझ्यासोबत रहायचे असेल तर माझी त्यासाठी तयारी आहे, असे त्यांने सांगितले. त्या तिघांचे पोलिसांनी समुपदेशन केल्यावर त्या तिघांनीही आपल्या वागण्यात बदल करण्याचे आश्वासन पोलिसांना दिले आहे. पतीने मनिषाच्या वागण्यात काही बदल करण्यासाठी काही महिन्याचा अवधी दिला आहे.
पोलिसांनी अथक प्रयत्न व समुपदेशन करून दोघांचेही संसार वाचविण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र सोशल मीडिया हे माध्यम जितके साधक तितकेच बाधकही ठरते हेच या घटनेवरून समोर आले आहे. जुन्या आठवणींना उजाळा देणे इतपत ठिक परंतू या आठवणी आपल्या संसारापेक्षा आणि कुटूंबापेक्षा अधिक महत्वाच्या ठरल्या तर सुखी कुटूंबही उद्धवस्त होते हे वास्तव पुन्हा एकदा समोर या घटनेमुळे समोर आले आहे.