खालापूर : घराच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमानिमित्त पाहुणी म्हणून आलेल्या महिलेने जेवणामध्ये विषारी औषध टाकल्याने विषबाधा होऊन तीन लहान मुले आणि अन्य दोघांचा मृत्यू झाला.
ही घटना महड गावात १८ जून २०१८ रोजी घडली होती. याप्रकरणी प्रदीर्घ सुनावणीनंतर तब्बल सात वर्षांनी पनवेल सत्र न्यायालयाने निकाल दिला असून आरोपी महिलेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रज्ञा सुरवसे असे आरोपी महिलेचे नाव आहे.
पोलीस तपासात आरोपी महिलेने सासू, नवरा, नणंद तसेच त्यांच्या नातलग कुटुंबीयांकडून होणाऱ्या कथित त्रासाचा बदला घेण्यासाठी रागापोटी हे कृत्य केल्याचे समोर आले. सदर गुन्ह्यामध्ये पनवेल सत्र न्यायालयाने संपरिक्षा पूर्ण करुन निकाल जाहीर केला.
आरोपी महिला प्रज्ञा सुरवसे हिला जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली. गुन्ह्याच्या तपास पोलीस निरीक्षक विश्वजीत काडूंगडे आणि त्यांच्या पथकाने केला.