पिंपरी – गणेशोत्सव सुरू झाला आणि दीड दिवसाच्या गणरायांचे विसर्जन देखील झाले तरी अद्याप महापालिका प्रशासनाचे पिंपरीतील विसर्जन घाटांकडे अजून लक्ष गेले नाही. पिंपरीतील सुभाष घाट आणि वैभवनगर घाटाची दुरवस्था अद्याप तशीच आहे. यामुळे मंगळवारी (दि.3) दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन करण्यासाठी आलेल्या भाविकांनी संताप व्यक्त केला.
सुभाष घाटावर कृत्रिम हौदात विसर्जन करण्यासाठी महापालिकेने कायमस्वरूपी हौद उभारला आहे. मात्र, या हौदाच्या फरशा निखळल्या असल्याने गणेशमूर्ती ठेवताना अडचण होते. तसेच तुटलेल्या फरशा भक्तांना लागून इजा होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या घाटावरील पायऱ्यांवरून हौदालगत ड्रेनेजचे पाणी थेट नदीत मिसळत आहे.
यामुळे दुर्गंधी तर येतेच मात्र नदीचे पाणीही दूषित होत असून त्यात गणेशमूर्ती कशा विसर्जित करायच्या, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच या घाटावर चाराही तसाच पडून होता. तसेच नदीपात्रातील गाळही तसाच पडून होता. दुपारपर्यंत येथील हौद कोरडाच होता. घाटावर अग्निशामक दल, महापालिका कर्मचारी यापैकी कोणीही उपस्थित नव्हते. वैभवनगर घाटावर मंगळवारी महापालिकेने साफसफाई मोहीम राबविली. मात्र नदीपात्रातील कचरा काढून पायऱ्यांवरच ठेवला. घाटावरील माती तशीच होती. यावर पाणी पडल्याने भाविकांचे पाय घसरत होते. घाटाच्या उजव्या बाजूलाही नदीपात्रातील घाण तशीच असल्याने दुर्गंधी पसरली होती.