पिंपरी – पिंपरी चिंचवडमध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील जागा वाटपाचा तिढा सुटला असे वाटत असतानाच पिंपरी शहरातील कॉंग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पिंपरी शहरातील तीन पैकी एक मतदारसंघ आम्हाला द्या, अन्यथा राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणारच नाही, अशी भूमिका कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली आहे. पिंपरी येथे गुरुवारी कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी “आक्रोश मेळाव्या’चे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी एनएसयुआयचे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे, माजी नगरसेवक अख्तर चौधरी, युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, युवा कार्यकर्ते निखिल भोईर व अन्य उपस्थित होते.
आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर मेळाव्यात पक्षाचे नेते अजित पवार यांनी शहरातील भोसरी, पिंपरी आणि चिंचवड हे तीनही मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्याचे सांगितले. त्यामुळे कॉंग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले असून, आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या एकतर्फी निर्णयाचा निषेध नोंदविण्यासाठी आक्रोश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
यावेळी मनोज कांबळे म्हणाले, पिंपरी शहरातील तीन पैकी एक मतदारसंघ आम्हाला द्या, अन्यथा राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचारच करणार नाही. पिंपरी-चिंचवडची स्वतंत्र ओळख ही कॉंग्रेसच्या येथील स्थानिक नेत्यांनी निर्माण करून दिली आहे. शहरात कॉंग्रेसला पुन्हा सुगीचे दिवस परत आणण्यासाठी कॉंग्रेसकडून एका मतदार संघावर दावा सांगितला असल्याचे कांबळे म्हणाले. मात्र तसे झाले नाही तर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी शेवटी टोकाची भूमिका म्हणून राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे कामच करणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहरात कॉंग्रेसला माननारा वर्ग अद्यापही आहे. कॉंग्रेसची विचारधारा या शहराला मान्य आहे, असे अख्तर चौधरी म्हणाले. मात्र राष्ट्रवादीने आजपर्यंत येथे दगाफटका केला आहे. राष्ट्रवादीने सहकारी पक्षालाच एकप्रकारे वेठीला धरले. हे सर्व मुद्दे पक्षश्रेष्ठींच्या समोर ठेवले जाणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले. समविचारी, सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कायमच अन्याय आणि गळचेपी करण्यात आली असल्याची खदखद निखिल भोईर यांनी व्यक्त केली.
शहर कॉंग्रेसचा “आक्रोश मेळावा’ पुन्हा गटबाजी उघड, अध्यक्षच अनुपस्थित
पिंपरी-चिंचवड शहरात घायकुतीला आलेल्या शहर कॉंग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. शहराध्यक्ष सचिन साठे एका बाजूला तर इतर कार्यकारिणी दुसऱ्या बाजूला असे चित्र आहे. आजच्या मेळाव्यालाही बोटावर मोजण्याइतके पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सचिन साठे यांनीही मेळाव्याला दांडी मारली. तर मेळाव्यात इतर पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्षांवरही तोंडसुख घेत त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली.