‘निसर्ग’ चक्रीवादळाचा फटका बसलेले गाव
पिंपरी – ठाकूरवाडी (जि. रायगड) 54 कुटुंब आणि सुमारे 250 लोकवस्ती असलेले गाव. “निसर्ग’ चक्रीवादळामध्ये येथील घरांचे पत्रे, कौले उडाली. भिंती कोसळल्या. साधारणपणे 10 ते 13 घरे जमीनदोस्त झाली. रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी, खालापूर पंचायत समिती यांच्याकडून आर्थिक मदत मिळाल्यानंतर आता हे गाव हळूहळू सावरते आहे. पिंपरी-चिंचवड येथील थेरगाव सोशल फाउंडेशनच्या तरुणांचा गट संबंधित गावापर्यंत पोहचला. त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत ग्रामस्थांसाठी मदतीचा हात देऊ केला आहे.
राज्यात नुकत्याच येऊन गेलेल्या “निसर्ग’ चक्रीवादळाने सर्वत्र दाणादाण उडविली. चक्रीवादळाच्या तडाख्यात रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील नागनाथ उंबरविरा-ठाकुरवाडी हे गावही सापडले. येथे जाण्यासाठी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरून खालापूर आणि तेथून पाच किलोमीटरवर असलेल्या बीड गावात जावे लागते. तेथून या वाडीत जायला डोंगरातून वाट काढत साधारण 10 ते 12 किलोमीटरवर चालत जावे लागते. पाऊस गेल्यानंतर टेम्पो किंवा मोठ्या गाड्या येथे रस्ता नसताना देखील वाट काढत जातात.
थेरगाव सोशल फाउंडेशनच्या तरुणांचे पथक या ठिकाणी नुकतेच जाऊन आले. संबंधित तरुणांनी वाडीतील शाळेजवळ ग्रामस्थांना महिनाभर पुरेल एवढे अन्नधान्य, चादर, ब्लॅंकेट, सतरंजी, भांडी आदी साहित्याचे वाटप केले. अनिकेत प्रभू, राहुल सरोदे, अनिल घोडेकर, नीलेश पिंगळे, अंकुश कुदळे, माई शेळवंडे, प्रसाद भेडजगावकर, बालाजी दळवी, संदीप येळवंडे, सचिन क्षीरसागर, संदेश गोडांबे, स्वप्नील मंडल आदी तरुणांच्या गटाने ही मदत केली.
गाव येतंय पूर्वपदावर
ठाकूरवाडीतील ज्यांच्या घरावरची कौले किंवा पत्रे उडाले होते त्या घरांवर कौले, पत्रे टाकण्यात येत आहेत. ज्या 11 कुटुंबांनी रेल्वेच्या ब्रिटिशकालीन बोगद्यात आश्रय घेतला होता, त्यांनी घराच्या भिंती उभारण्यास सुरवात केली आहे. ग्रामस्थांना रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी, खालापूर पंचायत समितीकडून आर्थिक मदत मिळाली. त्याशिवाय, विविध स्वयंसेवी संस्थांनी मदत केली. त्यामुळे गाव हळूहळू सावरत असल्याची माहिती ठाकूरवाडीतील शिक्षक भानुदास पाटील यांनी दिली.
अन् सर्वांचेच डोळे पाणावले..
या वादळात साधारणपणे 10 ते 13 घरे जमीनदोस्त झाली. येथून जवळच असलेल्या रेल्वेच्या ब्रिटिशकालीन बोगद्यात 11 कुटुंबांनी आसरा घेतला. त्या रात्री आम्ही उपाशीपोटीच झोपलो. पुढील तीन दिवस तिथेच आश्रय घेतला. त्यामध्ये एक महिला तर केवळ 15 दिवसांची बाळंतीण होती. हा सर्व घटनाक्रम ग्रामस्थ राजेश पारधी यांनी ऐकविल्याने सर्वांचेच डोळे पाणावले असा अनुभव नीलेश पिंगळे यांनी सांगितला.