चिंचवडमध्ये सुमारे 13 तास मतदान…
पिंपरी – सकाळपासून सुरु झालेल्या लोकशाहीच्या उत्सवाची (मतदानाची) सायंकाळी उशिरा सांगता झाली. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या धावपळीची शेवटच्या मतासोबतच सांगता झाली. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदार राजाने एकूण 11 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांमध्ये बंद केले. या विधानसभा मतदान क्षेत्रामध्ये सर्वांत शेवटचे मतदान सायंकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी झाले. कोणत्याही अनुचित किंवा अप्रिय घटनेविना शांतीपूर्ण वातावरणात चिंचवड विधानसभा मतदार संघाची मतदान प्रक्रिया पार पडली. चिंचवड विधानसभा मतदार संघात सुमारे 53.68 टक्के मतदारांनी आपल्या मताधिकाराचा हक्क बजाविला. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 3 टक्क्यांनी मतदानात घट झाली.
सकाळी जॉगिंगला निघालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी काही मतदान केंद्रांवर मतदानाचा श्रीगणेश केला. सकाळच्या पहिल्या चार तासात मतदानाची टक्केवारी 16.37 टक्के होती. तर दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाचा टक्का 35.79 टक्क्यांपर्यंत जाऊन पोहचला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत या मतदार संघात 51.33 टक्के मतदारांनी आपल्या मताधिकाराचा हक्क बजाविला.
2009 च्या विधानसभा निवडणुकीत 50.53 टक्के मतदान झाले होते. तर 2014च्या विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली आणि मतदानाचा आकडा 56.30 टक्क्यांवर पोहचला होता.
यंदा मात्र हा आकड तीन टक्क्यांनी घसरला आहे. मतदारसंघातील 491 मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदान केले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानासाठी आलेल्या सर्व मतदारांनी मतदान करता आले. या विधानसभा मतदान क्षेत्रामध्ये सर्वांत शेवटचे मतदान सायंकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी झाले. त्यानंतर मतदान संपल्याचे जाहीर करण्यात आले. अर्थातच सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेले मतदान सायंकाळी 7 वाजून 40 मिनिटांपर्यंत सुरू होते.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात एकूण 11 उमेदवार मतदानाच्या रिंगणात असले तरी मुख्य लढत महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप आणि सर्वपक्षीय पुरस्कृत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यातच अत्यंत अटीतटीची होती. सुरुवातील एकतर्फी वाटणारी ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात अत्यंत चुरशीच्या अवस्थेत पोहोचली. मतदार राजाने कुणाला कौल दिला आहे, हे येत्या गुुरुवारी (दि.24) स्पष्ट होणार आहे.
मशीनमध्ये बिघाड आणि संशयकल्लोळ
सकाळी सात वाजता मतदानाला अत्यंत शांततेत सुरुवात झाल्यानंतर अनेक ठिकाणी मतदान प्रक्रियेत व्यत्यय आला. मतदारसंघातील मतदान सुरू असलेल्या ठिकाणच्या तब्बल 21 व्हीव्हीपॅट मशीन बदलाव्या लागल्या. तांत्रिक बिघाडामुळे तीन कंट्रोल युनिट आणि तीन बॅलेट युनिट बदलावे लागले. अनेक ठिकाणच्या मशीन बदलाव्या लागल्यामुळे संशयाचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.