पिंपरी – गेली दोन दिवसांपासून पावसाची उघडझाप व ढगाळ हवामानामुळे वातावरणात कमालीचा उकडा वाढला आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. दिवसभरातील वातावरणामुळे सूर्यदर्शनदेखील अभावानेच होत आहे. तर सकाळी पडणाऱ्या धुक्यामुळे पिकांवरील किडीचा धोका वाढला आहे.
पुढील अकरा दिवस शहरात सूर्यदर्शन होणार असल्याचा अंदाज “स्कायमेट’ने मागील आठवड्यात वर्तविला होता. छत्तीसगडच्या दक्षिण-उत्तर भाग व परिसर आणि अग्नेय अरबी समुद्र, कर्नाटक आणि उत्तर केरळ परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. राज्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान तयार होत असून, पावसासाठी पोषक वातावरणाची स्थिती आहे. मध्य महाराष्ट्रबरोबरच कोकणात तुरळक सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.
राज्यातील ऊन पडत असल्याने शेतातील ओलाव्याचे प्रमाण कमी होत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिकांवर रोग किडीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शेतकरी शेतीकामांमध्ये गुंतले असल्याचे दिसून येते.