पिंपरी – शहरात पाच लाखांहून अधिक मिळकती अर्थात लहान-मोठ्या इमारती आहेत. मोठ्या संख्येने उद्योग, शॉपिंग कॉम्पलेक्स, सोसायट्या, एटीएम सेंटर आहेत. या सर्व ठिकाणी सुरक्षा रक्षकांची गरज भासते. परंतु ज्यांच्यावर आपण सुरक्षेची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवित आहोत, ते विश्वासास पात्र आहेत का? याची पडताळणी केली जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. एखाद्या एजन्सीला काम दिले जाते आणि एजन्सीने दिलेल्या सुरक्षा रक्षकांच्या भरोसे नागरिक राहतात. याबाबत सावधानी बाळगणे अतिशय गरजेचे असून सुरक्षा रक्षकाची पोलीस पडताळणी झाली आहे की नाही हे तपासून पाहणे गरजेचे आहे. याबाबत पोलीस देखील सतर्क असून गेल्या वर्षभरात आठ हजार 153 सुरक्षा रक्षकांची पोलीस पडताळणी करण्यात आली आहे.
शहराच्या सुरक्षेची पोलिसांनंतर प्रमुख जबाबदारी सुरक्षा रक्षकांची असते. संपूर्ण सोसायटी मधील शेकडो, हजारो लोक सोसायटीच्या गेटवर असलेल्या दोन तीन सुरक्षा रक्षकांच्या भरवशावर असतात. सुरक्षा रक्षकांच्या जबाबदारीवर अनेकजण आपले घर, दुकान, आस्थापना सोडून पुढील कामासाठी जातात. सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारी व्यक्ती तिऱ्हाईत असते. त्याच्यावर जबाबदारी, विश्वास सोपविण्यापूर्वी त्याच्याबद्दल माहिती करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. पोलीस पडताळणीमध्ये संबंधितांचे रेकॉर्ड तपासले जाते. एखाद्या व्यक्तीवर गुन्हे दाखल असतील तर त्याबाबत पोलिसांना माहिती मिळते. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत मागील वर्षभरात आठ हजार 153 जणांचे अर्ज आले. त्यातील एकही व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आढळली नाही.
अशी करा पोलीस पडताळणी
पोलीस पडताळणी करण्यासाठी शासनाने ऑनलाइन सुविधा सुरु केली आहे. लिी.ारहरेपश्रळपश.र्सीें.ळप या संकेतस्थळावर भेट देऊन तिथे प्रथम रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर लॉगिन करून अर्ज भरावा. अर्जामध्ये नाव, पत्ता आणि इतर माहिती द्यावी. फी भरल्यानंतर अर्ज जमा करावा. अर्ज जमा झाल्यानंतर सुरुवातीला स्थानिक पोलीस कागदपत्रांची पडताळणी करतात. त्यानंतर अर्जदाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यासाठी अर्ज पोलीस आयुक्तालयातील पडताळणी शाखेत येतो. तिथे पडताळणी झाल्यानंतर अर्जदाराचा अर्ज मंजूर होतो. अर्जदाराच्या नावाशी जुळणारे एखाद्या गुन्हेगाराचे नाव आढळल्यास तसेच इतर त्रुटी राहिल्यास पडताळणी शाखेतून खातरजमा केली जाते. पडताळणी शाखेतून अर्ज मंजूर झाल्यानंतर अर्जदाराला पोलीस पडताळणी प्रमाणपत्र डाउनलोड करण्याबाबत संदेश प्राप्त होतो.
16 हजारांहून अधिक नागरिकांनीही केली चारित्र्य पडताळणी
सर्वसामान्य नागरिकांना नोकरी आणि इतर ठिकाणी चारित्र्य प्रमाणपत्र (पोलीस पडताळणी) मागितले जाते. सन 2022 या वर्षभरात आयुक्तालयाच्या हद्दीतील 16 हजार 390 नागरिकांनी चारित्र्य प्रमाणपत्र घेतले.
पोलीस पडताळणीच्या प्रक्रियेसाठी शासनाने 30 दिवसांचा कालावधी दिला आहे. त्या कालावधीत पोलीस पडताळणीची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या पडताळणी शाखेकडून हे काम अवघ्या दहा दिवसांत पूर्ण केले जाते. नागरिकांची कुठलीही अडवणूक होणार नाही, याकडे विशेष लक्ष दिले जाते. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून अर्जाची दहा दिवसांत निर्गती केली जाते.
– रावसाहेब जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पडताळणी शाखा
सुरक्षा रक्षकच आढळले चोर-दरोडेखोर
चोरी, दरोडा यांसारख्या गंभीर गुन्ह्यात घटनास्थळी सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचा समावेश आढळला आहे. निगडी येथे एका सोसायटीत काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाने कोट्यवधींचा ऐवज घेऊन पोबारा केला होता. कंपनीतील अधिकाऱ्यासोबत मिळून सुरक्षा रक्षकाने पाच लॅपटॉपचा अपहार केल्याचा गुन्हाही निगडी पोलीस ठाण्यात दाखल आहे. एमआयडीसी भोसरी परिसरात सुरक्षा रक्षकाने दीड लाखांचे साहित्य चोरल्याचा गुन्हा एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात दाखल आहे.
न्यायालयानेही सांगितली आवश्यकता
सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यांच्या मते सुरक्षा रक्षकांना पोलीस पडताळणी करण्यासाठी खूप वेळ जातो. त्यामुळे त्यांच्या कामावरील नियुक्तीसाठी काही दिवसांचा कालावधी लागतो. यात त्यांचे नुकसान होत असल्याने पोलीस पडताळणीची अट शिथील करावी. यावर मुख्य न्यायाधीश मंजूला चिल्लूर व न्यायमूर्ति एमएस सोनक यांच्या खंडपीठाने निर्णय दिला. खंडपीठाने म्हटले कि, सुरक्षा रक्षकांवर नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेची महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली जाते. त्यामुळे सुरक्षा रक्षकांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची पडताळणी होणे आवश्यक आहे.