ठेकेदारांची चौकशीची मागणी : स्पर्शच्या बिलावरून महासभेत नगरसेवक आमने – सामने
पिंपरी – ठेकेदारांच्या कामांवरुन आणि आपपल्या हितसंबंधांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महासभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये तुंबळ वाकयुद्ध झाले. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये करोनाच्या काळात ऑक्सिजन अभावी 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला.
तर स्पर्श या रुग्णालयांने एकही रुग्ण भरती न करता कोट्यवधी रुपयांचे बिल लाटले असा आरोप राष्ट्रवादीने केला. या दोन्ही ठेकेदारांच्या ठेक्याविरोधात महासभेत सत्ताधारी व विरोधक आमने सामने आले. आपल्याशी संबंधित असलेल्या ठेकेदारांना पाठिशी घालण्यासाठी सभागृहामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला. सत्ताधारी भाजपने गॅप कंपनीवरून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर तोंडसुख घेतले. तर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी स्पर्श रुग्णालयाला दिलेल्या बिलावरून सत्ताधारी भाजप व प्रशासनाला धारेवर धरले.
पिंपरी चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब सभा आज पालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर माई ढोरे होत्या. महासभेच्या सुरुवातीलाच प्रश्नोत्तराचा तास घेण्यात आला. त्यामध्ये भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी वायसीएम रुग्णालयामध्ये ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या गॅप या कंपनीविषयी काही प्रश्न उपस्थित केले. तर राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश बहल यांनी याच चर्चेदरम्यान स्पर्श हॉस्पिटलला दिलेल्या बिलावरून सत्ताधारी भाजपवर गंभीर आरोप केले.
नगरसेवक कामठे यांनी वायसीएम रुग्णालयामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये 10 रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला असल्याने संबंधित गॅप कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. ते म्हणाले, वायसीएम रुग्णालयामध्ये ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या गॅप कंपनीमुळे 10 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. संबंधित कपंनीने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला असून त्यांना काही नगरसेवक पाठिशी घालत आहेत. ठेकेदारांने शट डाऊन केल्यामुळे रुग्णांचा जीव गेला आहे.
विरोधकांचे उलट प्रश्न
तर यावर बोलत असताना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी कामठे यांनी महत्त्वाचा विषय आणला आहे, मात्र ते इतक्या दिवस शांत का होते असा सवाल विचारला. नगरसेवक योगेश बहल यांनी रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी थेट ठेकेदाराला सोडून थेट सत्ताधारी आणि डॉक्टरांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, ऑगस्ट महिन्यामध्ये वायसीएममध्ये मृत्यू झाले होते. तर सत्ताधारी पक्ष एवढ्या दिवस शांत का ? त्यांनी चौकशीची मागणी का केली नाही ? आपल्याकडे जम्बो, ऑटो क्लस्टर रुग्णालये होती. जर वायसीएममध्ये कमतरता होती तर डॉक्टरांनी त्या रुग्णांना या रुग्णालयात का हलविले नाही.
तसेच गॅस पाइपलाइनमधून गॅसची कमतरता जाणवली तर आप्तकालीन सिलिंडर लावून रुग्णांचा जीव वाचवता येतो. आपल्या डॉक्टरांना रुग्णांना वाचविण्यासाठी तेवढही करता आले नाही का? दुसरीकडे स्पर्श रुग्णालयाने काहीही काम न करता त्यांना कोट्यवधीचे बिल पालिकेने दिले आहे. त्यासाठी स्थायीची मान्यता न घेता, परस्पर खोट्या सह्या करून बिल देण्यात आले आहे. स्पर्श रुग्णालयामध्ये एकही रुग्ण नसताना सव्वा तीन कोटींचे बिल अदा केले आहे.
दोघांचीही त्रयस्थ अधिकाऱ्यांकडून चौकशी
दरम्यान, याबाबत खुलासा करत असताना आयुक्त राजेश पाटील यांनी या दोन्ही संस्थांची लवकरच त्रयस्थ अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी करणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, पालिकेमध्ये कंत्राट पद्धतीमध्ये अनियमितता होत असल्याचे सर्वच सदस्य सांगत आहे. ठेकेदारांची पात्रता, कामामध्ये होणारी अनियमितता यावर कठोर कारवाई केली जाईल. ज्या गोष्टी नजरेत येतील त्यांच्यावर कारवाई करेल. वायसीएम रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपनीची चौकशी केली जाईल. तसेच स्पर्श रुग्णालयाने केलेल्या कामाचीही चौकशी होईल. त्यानंतर त्यांना बिल द्यायचे की नाही याचा निर्णय घेण्यात येईल. या दोन्ही ठेकेदारांची चौकशी त्रयस्थ अधिकाऱ्यांकडून केली जाईल.
––––––––––––