अपघाताचा धोका : बेशिस्तपणामुळे वाहतूक कोंडीचा त्रास
पिंपरी – रिक्षामध्ये तीन प्रवासी घेण्याची परवानगी आहे. मात्र पॅगो रिक्षामध्ये चालकाच्या बाजूला दोन, पाठीमागील बाजूस चार आणि डिक्कीमध्ये सीट बसवून त्यामध्ये आणखी चार, अश रितीने दहा प्रवाशांची वाहतूक केली जाते. यामुळे अपघात होऊन अनेकांना प्रवासी जखमी झाले आहेत. जादा नफ्यासाठी पोलिसांच्या आशिर्वादाने रिक्षा चालक प्रवाशांच्या जिवाशी खेळत आहेत.
शहरात सार्वजनिक वाहतूक सक्षम नाही. मुख्य मार्गावर बसचे प्रमाण बऱ्यापैकी असले तरी अंतर्गत भागात अजूनही रिक्षा सेवेवर अवलंबून राहावे लागते. उपनगरातून शहराकडे येण्यासाठी शेअर रिक्षा हा पर्याय प्रवासी निवडतात. जास्त नफा कमविण्यासाठी तीन आसनी रिक्षांमध्ये प्रवासी अक्षरश: कोंबले जातात. साध्या तीन आसनी रिक्षांमध्ये सहा प्रवासी तर पॅगोमध्ये दहा प्रवासी घेतले जातात.
चालकाच्या दोन्ही बाजूला प्रवासी बसल्याने चालकाला रिक्षा चालविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातूनच अपघात घडतात. बसच्या थांब्याजवळ शेअर रिक्षांचे स्टॅण्ड उभारण्यात आले आहेत. त्यामुळे बसचे प्रवासी पळविण्याचे काम शेअर रिक्षावाले करीत आहेत.
कुठेही अचानक ब्रेक
शेअर रिक्षा या कोठेही हात केला तर थांबतात, हे प्रवाशांसाठी जरी सोयीचे असले तरी रिक्षा चालक अचानक ब्रेक दाबत असल्याने पाठमागून येणारी वाहने धडकून अपघातही होतात. तसेच प्रवासी मिळविण्यासाठी हे रिक्षा चालक चौकातील रस्त्याच्या मध्ये उभे राहतात. त्यामुळे चौकांमध्ये नेहमीच वाहतूकीची कोंडी होते. चौकात कर्तव्यावर असलेले पोलिसही नेहमीची बाब म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात. पोलिसांनी वाहतुकीचे नियमन करायचे की रिक्षा चालकांना चौकातून हाकलत
बसायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेअर रिक्षांचा नंबर किंवा प्रवासी घेण्यावरूनही चालकांमध्ये हाणामारी होत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे.
करोनाच्या प्रसारास पोषक वातावरण
करोनाचा प्रसार टाळण्यासाठी चालक आणि प्रवासी यांच्यात पारदर्शक प्लास्टीकचा पडदा लावण्याची सूचना वाहतूक पोलिसांनी केली आहे. मात्र आजही काही रिक्षा चालक चार प्रवासी मागील सीटवर बसवत आहेत. सध्या चालकाशेजारी प्रवासी घेत नसल्याचे रिक्षा चालक सुरक्षित आहेत. मात्र प्रवासी दाटीवाटीने बसत असल्याने करोनाचा प्रसार होण्याची भीती आहे.
शेअर रिक्षांमध्ये चोऱ्याही
शेअर रिक्षामध्ये प्रवासी दाटीवाटीने बसविले जातात. याचा फायदा पाकीटमार व चोरटे घेतात. दागिने घातलेली महिला पाहून तिच्या शेजारी बसतात. प्रवासात महिलेचे पर्स, दागिने काढून घेतल्यावर धूम ठोकतात. असे अनेक प्रकार शहरात घडले आहेत.
शेअर रिक्षांसाठी हप्तेखोरी
शहरातील बहुतांश भागात शेअर रिक्षांचे स्टॅण्ड आहेत. जादा नफा कमविण्यासाठी जादा प्रवासी घेतले जातात. पोलिसांच्या साक्षीने ही अवैध प्रवासी वाहतूक होते. त्यासाठी रिक्षा चालकांकडून महिन्याला ठराविक हप्ता पोलिसांना दिला जातो. या पैशांच्या वसुलीसाठी खासगी व्यक्तींची (झिरो पोलीस) नियुक्ती केली जाते.
कारवाईही ठरली कुचकामी
याच वर्षाच्या सुरुवातीला वाहतूक पोलिसांनी बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईची मोहीम उघडली होती. त्यामध्ये चार हजार 874 रिक्षा चालकांवर कारवाई केली होती. त्यातून 11 लाख 67 हजारांचा दंड केला होता. मात्र कारवाई संपुष्टात येताच पुन्हा रिक्षा चालकांचा बेशिस्तपणा सुरू झाला. यामुळे रिक्षा चालकांवरील ही कारवाई देखील कुचकामी ठरली.