पिंपरी – महावितरणने ग्राहकांना विविध हप्त्यांमध्ये वीज बिल भरण्याची मुभा दिली आहे. यामुळे लॉकडाऊननंतर वीज बिल महसूल वाढला असल्याचे चित्र महावितरणच्या भरणा विभागात दिसत आहे.
मार्च महिन्यात लॉकडाऊन झाल्यानंतर उद्योगधंदे बंद राहिल्याने हजारो कामगारांना नोकरी गमवावी लागली. परिणामी अर्थकारणच कोलमडल्याने नागरिकांकडून वीजबिल भरणा करण्यात आला नाही.
लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करत असतानाच वीज बिलांमध्ये सवलत देण्याची आग्रही मागणी होऊ लागली होती. त्यामुळे महावितरणकडून सवलत दिली जाण्याची दाट शक्यता होती. मात्र, महावितरणकडून वीज बिलात कोणत्याही प्रकारची सवलत देण्यात आलेली नाही. मात्र, अनेक ग्राहकांनी मार्च महिन्यापासून वीज बिल भरले नसल्याने महावितरणची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे.
दरम्यान, वीज बिलात कोणतीही सवलत देणार नसल्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आठ महिन्याचे थकीत वीज बिल सुलभ हप्त्यांमध्ये भरण्यासाठी ग्राहक महावितरणच्या कार्यालयात चकरा मारु लागले आहेत. शक्य तेवढी जास्त रक्कम हप्त्यांमध्ये अदा करण्याचे अभियंत्यांकडून ग्राहकांना आवाहन केले जात आहे.
वीजपुरवठा करणार नाही खंडित
मार्च महिन्यापासून वीज बिल न भरलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात आला आहे. आर्थिक अडचणीत असल्याने ग्राहकांना वीज बिले वेळेवर भरता आली नाहीत. लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थकीत वीज बिले असूनही कोणत्याही ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला नाही.
महावितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना सुलभ हप्त्यांमध्ये वीज बिल भरण्याची सवलत उपलब्ध करुन दिली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे दैनंदिन गोळा होणाऱ्या महसुलात वाढ झाली आहे.
– शिवाजी वायफळकर, कार्यकारी अभियंता, पिंपरी विभागीय कार्यालय, महावितरण