पिंपरी – लाच प्रकरणामध्ये रंगेहाथ पकडलेल्या स्थायी समिती अध्यक्षांच्या पाठीमागे भाजप पक्ष उभा राहिला. मात्र, नागरिकांसाठी आंदोलन करणाऱ्या महिला नगरसेविकेला पक्षाने वाऱ्यावर सोडले. ही भाजपची दुटप्पी भूमिका आहे. चोर म्हणून जे पकडले गेले त्यांच्या-सारखेच दुसऱ्यांनाही समजण्याची चूक भाजप करत असल्याची टीका कासारवाडीच्या नगरसेविका आशा शेंडगे यांनी गुरुवारी (दि. 23) पत्रकार परिषदेत केली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपाच्या नगरसेविका आशा शेंडगे यांनी नागरी समस्यांवरून गत आठवड्यात (दि. 9) आयुक्तांच्या दालनासमोर शाईफेक आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे चिडलेल्या आयुक्तांनी शेंडगे यांना थेट पोलिसांच्या हवाली करत शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
यामुळे शेंडगे यांना तब्बल 12 दिवस करावासात राहावे लागले.मंगळवार (दि.21) रोजी त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत इतरही सात महिलांना या कालावधीत नाहक त्रास सहन करावा लागला होता. जामिनावर मुक्तता झाल्यानंतर त्यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. यावेळी त्यांनी स्वपक्षातील दुटप्पी भूमिकेवरून सडकून भाजपवर सडकून टीका केली. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेविका सीमा सावळे
उपस्थित होत्या.
सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत भाजपला गांभीर्य नाही
शेंडगे यांच्या पाठीशी पक्ष म्हणून महापालिकेचे पदाधिकारी तर सोडाच परंतु पक्ष पातळीवरील एकही पदाधिकारी समर्थनार्थ न आल्यामुळे शेंडगे या तर बाजूला फेकल्या गेल्याचे स्पष्ट झाले मात्र नागरिकांच्या प्रश्नांसाठी पुढाकार घेणाऱ्यांना पक्षाचे सहकार्य होत नाही, हा संदेश देखील या प्रकारामुळे गेल्याने पक्षाची दुटप्पी भूमिका अधोरेखित झाली आहे. आंदोलनाला पाठिंबा न देणाऱ्या भाजपाने कासारवाडीतील नागरिकांच्या प्रश्नांबाबत अद्यापही आपली भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी, त्यांच्या अडचणींबाबत या पक्षाला काहीच सोयरसुतक राहिले नाही, असाही संदेश या प्रकरणातून गेला आहे.
भ्रष्टाचारात राजकारणीही गुंतले आहेत
आशा शेंडगे म्हणाल्या, माझ्यावर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात मी खोदाईचे काम बंद केले नव्हते, तर लोकशाही मार्गाने त्या कामाचा विरोध करण्यासाठी आले होते. त्यापूर्वी अनेकदा मी प्रशासनाकडे काम सुरू करण्याची तारीख व त्यानंतर ते किती दिवसात दुरुस्त करणार याची हमी मागत होते.
मला सणासुदीच्या काळामध्ये माझ्या प्रभागातील नागरिकांचा प्रवास चिखलात करायचा नव्हता. त्यासाठी मी विरोध केला होता. मात्र, स्वपक्षातून माझ्या पाठीमागे कोणी उभे राहिले नाही. कारण स्मार्ट सिटीच्या भ्रष्टाचारामध्ये जेवढे अधिकारी आहेत तेवढेच राजकारणीदेखील गुंतले आहे.
स्मार्ट सिटीवर बोलले की महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना मिरच्या लागतात. मात्र, यांच्या या भ्रष्टाचारामध्ये सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास होत आहे. स्मार्ट सिटीच्या या कामाबाबत आयुक्तांनी जनसुनावणी घ्यावी. त्यामध्ये सगळे पुराव्यानिशी सिद्ध करू असा दावा देखील शेडगे यांनी यावेळी केला.
स्मार्ट सिटीची कामे रेंगाळली
शहरात अद्यापही सुरू असलेल्या स्मार्ट सिटीतील कामांची मुदत मार्च 2020 मध्ये संपली आहे. स्मार्ट सिटीच्या कामांसाठी दोन वर्षांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र गेल्या चार वर्षांपासून शहरात ही कामे सुरू आहेत. या कामांसाठी सुरू असलेल्या रस्ते खोदाईचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना बसला आहे. दिरंगाईने सुरू असलेल्या कामाला महापालिकेतील सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोपही होत आहे. वारंवार होणारे आरोप, पालिकेत घडलेली शाईफेक प्रकरण आणि पाच महिन्यांवर आलेली महापालिका निवडणूक यामुळे तरी ही कामे पूर्णत्वास जातील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
22 पानांची पत्रे दिली – सीमा सावळे
यावेळी नगरसेविका सीमा सावळे म्हणाल्या, आयुक्तांना आम्ही स्मार्ट सिटीच्या भ्रष्टाचाराबाबत वारंवार पत्रे दिली आहेत. मात्र त्यानंतरही त्यांनी मोघम तक्रारी केल्या असल्याचा दावा केला आहे. मात्र आम्ही त्यांनी 22 पानांची पत्रे दिली आहेत. त्यामध्ये सविस्तर तक्रार आहे. खोदकाम कसे सुरू आहे. केबल किती फूट टाकली आहे. जीएसटी बिलांमध्ये कसा घोळ आहे याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.