पिंपरी -आयटी क्षेत्रातील एका बड्या कंपनीने आपल्या धोरणांमध्ये बदल करत बेंचवर असलेल्या अर्थात सध्या कोणत्याही प्रोजेक्टसाठी काम करत नसलेल्या आयटीयन्सच्या पगाराला कात्री लावली आहे. दोन वर्षांपूर्वी कंपन्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने पगार कपातीचे धोरण अवलंबिले होते. त्याची पुन्हा सुरुवात होत असल्याची भीती आता आयटीयन्सच्या मनात निर्माण झाली आहे. एका बड्या कंपन्यांनी केलेल्या बदलामुळे इतरही कंपन्या असाच निर्णय घेण्याबद्दल विचार करत असल्याने बेंचवरील आयटीयन्स आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता वाढली आहे.
पाश्चात्य देशात सुरू असलेली मंदी उत्तर अमेरिकेतील बॅंकांनी आपल्या टेक बजेटमध्ये केलेल्या कपातीचे परिणाम भारतीय आयटी क्षेत्रावर पडताना दिसत आहेत. अनेक अपकमिंग प्रोजेक्ट्स थांबले आहेत. तर सुरू असलेल्या प्रोजेक्ट्समध्ये देखील मनुष्यबळ कपात करण्यात आली आहे. यामुळे बॅंकींग, इन्शुरनस क्षेत्रातील कंपन्यांना सेवा देणाऱ्या अनेक आयटी कंपन्यांमध्ये बेंचवरील कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
ज्या कर्मचाऱ्यांना देण्यासाठी कंपनीकडे सध्या कोणतेही काम नाही, अशा कर्मचाऱ्यांना बेंचवरील कर्मचारी म्हटले जाते. आता या कर्मचाऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी कंपन्या आपल्या धोरणांमध्ये बदल करत आहेत. याचा थेट फटका कर्मचाऱ्यांना बसत असून त्यांच्या पगाराला कात्री लागत आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये तिसऱ्यांदा अशी परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. आता सर्वच कंपन्यांनी धोरणात्मक बदल केले नसले तरी काही कंपन्यांनी केले पाहून बहुतेक कंपन्यांमध्ये याबाबत विचार सुरू आहे.
पगार कपातीची कुऱ्हाड
कर्मचाऱ्याला कामावर घेताना कंपनी त्याच्या वेतनाच्या संरचनेत मोठी रक्कम व्हेरिएबल पे, इपीबी(एमलाइ परफॉर्मेंस बोनस) या मथळ्याखाली टाकली जाते. आता तुमचे काम चांगले नाही असे सांगत इपीबीला कात्री लावण्यात येत आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये दहा ते पंधरा हजार रुपयांची कपात होत आहे. याचा सर्वाधिक फटका बेंचवर असलेल्या कर्मचाऱ्यांना बसत आहे. त्यांच्याकडे सध्या कामच नसल्याने चांगले काम दाखविण्याचा प्रश्नच येत नाही.
पगारवाढ राहिली दूर…
साधारणतः आर्थिक वर्ष संपल्यानंतर मे महिन्यापासून सर्वांच्या पगारात वाढ होते. परंतु काही कंपन्यांनी पगारवाढ तर दूरच परंतु आहे त्या पगारावर कात्री चालविण्यास सुरुवात केली आहे. रेटिंगच्या पद्धतीत बदल करत कंपन्यांनी आता कर्मचाऱ्यांना ग्रेड देण्यास सुरुवात केली आहे. ज्यांना चांगले ग्रेडिंग मिळते, त्यांना पुढील तीन महिने पूर्ण पगार व अतिरिक्त रक्कमही मिळते. परंतु ज्यांना चांगली रेटींग मिळत नाही, त्यांना मात्र पुढील तीन महिने ही कपात सहन करावी लागणार आहे. यात काहीजणांना वरिष्ठांच्या नाराजीचीही झळ सोसावी लागते. नॅसेंट संघटनेच्या अध्यक्षांनी सांगितले की, एका कर्मचाऱ्याला तर केवळ वरिष्ठांच्या नाराजीमुळे शून्य रेटींग देण्यात आली. आता पुढील तीन महिने त्याच्या पगारात मोठी कपात होणार आहे.
एका बड्या कंपनीने इपीबीचे कारण पुढे करत अनेक कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली. याबाबत केंद्रीय कामगार मंत्रालयाकडे तक्रार केली असून मंत्रालयाकडून अशा कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्यात आली आहे. अशा कर्मचाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात असल्याने ती माहिती गोळा करुन सरकारला पाठविण्यात येणार आहे. इपीबीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांच्या पगाराला कात्री लावण्याची पद्धत चुकीची असून अन्य कंपन्याही हे करु शकतात. – हरप्रीत सलूजा, अध्यक्ष,
नॅसेंट इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी एम्प्लाइज सेनेट