पवनानगर – पवन मावळातील जवण तुंग रस्त्याचे डांबरीकरण 20 वर्षापूर्वी झाले होते. आता या रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण करायचे आहे. मात्र डोंगरवाडी (चावसर) येथील कामासाठी वन विभाग त्यासाठी परवानगी देत नाही. यामुळे नऊ गावातील नागरिकांना मोठमोठे खड्डे पडलेल्या रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
पवन मावळ परिसरात पावसाळ्यामध्ये दऱ्या खोऱ्यातून धबधबे वाहतात. निसर्ग सौंदर्यामुळे मावळातील अंतर्गत भागातही मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. वाढत्या लोकसंख्येमुळे या भागाचा विकास होऊ लागला आहे. येथील दळणवळणासाठी रस्त्याचे महत्व ओळखून शासनाने 20 वर्षापूर्वी या भागात डांबरी रस्ता केला होता. जवण तुंग या पवन मावळाच्या पश्चिम पट्ट्यातील मुख्य रस्त्यामुळे कोळे, चाफेसर, पानसोली, तुंग मोरवे, केवरे, चावसर, डोंगरवाडी, बोडशेळ, अजिवली जवन या नऊ गावात संपर्काचे जाळे निर्माण झाले होते. त्यामुळे येथील विकासाला गती मिळाली.
या भागात 20 वर्षापूर्वी केलेला रस्ता आता खराब झाल्याने शासनाने पुन्हा या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला. यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी देखील आला आहे. त्यामुळे येथील रस्त्याचे काम सुरू झाले होते. मात्र डोंगरवाडी (चावसर) हा भाग वनखात्याच्या अंतर्गत येतो. 20 वर्षापूर्वी वन विभागाचे कायदे आत्ता इतके कडक नव्हते. त्यामुळे या भागातील रस्ते करायचे असल्यास त्यावेळी परवानगीची आवश्यकता नव्हती. मात्र त्यानंतर कायद्यात बदल झाला. आता या परिसरातील कामासाठी परवानगी मिळावी, यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. या भागातील रस्त्याचा विकास करण्यासाठी शासनाने वन विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. मात्र वन विभाग येथील रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण करण्यासाठी परवानगी देत नसल्याचे या पट्ट्यातील काम खोळंबले आहे.
या भागातील कामगार, शालेय विद्यार्थी, शासनाचे कर्मचारी या रस्त्यावरून ये-जा करत असतात. दुचाकीस्वारांना या रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या परिसरात दररोज छोटे मोठे अपघात होत आहेत.
ठेकेदाराला दिली नोटीस
येथील वन विभागातील रस्त्याचे काम वगळता उर्वरित कामाला तीन वर्षापूर्वी सुरूवात झाली आहे. मात्र दीड वर्षापूर्वी येथील पुलाचे काम संबंधित ठेकेदाराने बंद केले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने मूळ ठेकेदाराला नोटीस
दिली आहे.