पिंपरी -रिक्षा चालकांच्या प्रश्नांवर रिक्षा संघटना आक्रमक झाल्या आहेत. संघटनांनी पुकारलेल्या बंदला पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन रिक्षा चालविण्यास चालकांना विरोध केला. परिणामी नागरिकांची व नेहमीप्रमाणे ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांना मात्र त्यामुळे गैरसोयीला सामोरे जावे लागले.
पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुणे आरटीओ कार्यालयापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले. या वेळी पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
रिक्षा चालकांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे रिक्षा चालकांना संप करायला भाग पाडले असल्याचा आरोप रिक्षा संघटना करत आहेत. मागण्या मान्य करून घेण्यासाठी बेमुदत आक्रमक आंदोलनाचा इशारा रिक्षा संघटनांनी दिला. त्यानुसार रिक्षांचा संप करण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे 20 हजार रिक्षा चालक-मालक यामध्ये सहभागी झाल्याचा दावा रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी करत आहेत. रिक्षा बंदमुळे रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांची व त्यांच्या नातेवाइकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
आक्रमकतेवरून संघटनांमध्ये एकमत नाही
रिक्षा संघटनांमध्ये सर्वांनीच सहभाग घेणे गरजेचे असल्याचे आवाहन प्रतिनिधी करत होते. रिक्षा चालू ठेवल्यास तोडफोड देखील करण्याचा इशारा काही संघटना देत होत्या. तर दुसऱ्या बाजूला लोकशाही मार्गाने आंदोलन करू, अशी भूमिका काही संघटनांनी घेतली. त्यामुळे संपाबाबत रिक्षा संघटनांमध्येच मतांतरे असल्याचे पहायला मिळाले.
संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची दादागिरी
काही ठिकाणी रिक्षा चालक प्रवासी घेत होते. त्या रिक्षा चालकांसोबत संघटनांचे प्रतिनिधी वादविवाद करून प्रवासी उतराविण्याची जबरदस्ती करत होते. तसेच संघटनांचे प्रतिनिधी चौकाचौकात थांबून इतर रिक्षा चालविणाऱ्यांवर लक्ष ठेवून होते. ये-जा करणाऱ्या रिक्षा चालकांची ते विचारणा करत असल्याच्या घटना घडल्या.