कर्मचाऱ्यांचा अभाव : एकच मशीन, ती देखील पडतेय बंद
पिंपरी – शहरामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. असे असले तरी अद्याप आयसीयूमध्ये असलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यांना प्लाझ्माची आवश्यकता आहे. त्यासाठी प्लाझ्मा डोनर देखील तयार होत आहेत. मात्र महापालिका प्रशासनाकडे यंत्रसामुग्रीच उपलब्ध नसल्याने प्लाझ्मा डोनेट करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा येत आहे.
रक्तदानाइतकेच प्लाझ्मादान श्रेष्ठ आहे. प्लाझ्मा दान केल्याने काहीही त्रास होत नाही. याशिवाय एखाद्या रुग्णाचा जीव वाचविणे शक्य आहे. शहरामध्ये करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 74 हजारांच्यावर आहे. यातील बरेच जण प्लाझ्मा दानासाठी पात्र असू शकतात.
सध्या सर्वत्र करोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला असला तरी गंभीर रुग्णांची संख्या जास्त आहे. या रुग्णांना वेळीच उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू होत आहे. कोविडच्या अतिगंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी ही उपयुक्त ठरत आहे.
काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या जनजागृतीमुळे अनेक नागरिक प्लाझ्मा दान करण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये फक्त एकच मशीन आहे. प्लाझ्मा संकलित करण्यासाठी मशीन वाढविण्याच्या वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. महापौर, उपमहापौर यांनीही मशीन वाढविण्यासाठी प्रशासनाला पत्र व्यवहार केला आहे. मात्र अद्यापही याबाबत प्रशासनाने अनुकूलता दाखविली नाही.
समुपदेशनचा अभाव
शहरामध्ये करोनाचा संसर्ग घटला आहे. आतापर्यंत 81 हजारांवर नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. तर शहरामध्ये करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील चांगले आहे. आतापर्यंत 74 हजार 504 रुग्ण बरे झाले आहेत. मात्र करोनामुक्त झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देताना त्यांचे समुपदेशन केले जात नाही. प्लाझ्मा दान करण्यासाठी त्यांचे अभिप्राय घेऊन आणि त्यांची संपूर्ण माहिती रुग्णालय किंवा कोविड केअर सेंटरमध्ये ठेवणे आवश्यक आहे. मात्र शहरामध्ये याबाबतीत काहीच उपाययोजना केल्या जात नाहीत. प्लाझ्मा दानासाठी योग्य प्रकारे समुपदेशन करणे महत्त्वाचे आहे.
शहराची लोकसंख्या 25 लाख आहे. करोनाबाधित उपचार घेणाऱ्या रुग्णांचीही संख्या जास्त आहे. प्लाझ्मा संकलित करण्यासाठी एकच मशीन आहे. ती देखील बंद पडते. तिथे कर्मचारी देखील नाही. एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे तेथील बाकीचे कर्मचारी क्वॉरंटाईन झाले आहेत. यामध्ये आयुक्तांनी लक्ष घातले पाहिजे. मात्र तसे होत नाही. उद्या मशीन येईल, परवा येईल अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे शहरातील रुग्ण व नातेवाइकांचे हाल होत आहे.
– संजय गायखे, प्रहार रुग्णसेवक