पिंपरी, दि. 17 (प्रतिनिधी) – नागरिकांना प्रश्न मांडता यावेत आणि ते सोडविण्यासाठीची निर्णय प्रक्रिया अधिकाऱ्यांना त्वरीत पार पडता यावी, यासाठी महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये दर सोमवारी घेण्यात येणारी जनसंवाद सभा आता महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी घेण्याचा निर्णय पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी घेतला आहे. त्यामुळे लोकाभिमुख प्रशासन आणि नागरिक यांच्यात एकवाक्यता राहण्यासाठी तत्कालीन आयुक्तांनी घेतलेला हा निर्णय देखील आयुक्त सिंह यांनी मोडीत काढला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी, तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी आणि प्रशासकीय निर्णयामध्ये तसेच होणाऱ्या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे, यासाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय दर सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत होते. त्याच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला असून महिन्यातील दुसऱ्या व चौथ्या सोमवारी म्हणजे महिन्यातून दोनच दिवशी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा होणार आहेत.
महापालिका कार्यालयीन कामकाजाचे प्रत्येक आठवड्यामध्ये केवळ पाच दिवस असल्याने तसेच दर आठवड्याला प्रत्येक सोमवारी जनसंवाद सभा असल्याने या सभेमध्ये दाखल झालेल्या नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पुरेसा अवधी प्राप्त होत नसल्याचे आढळून आले आहे. प्रत्येक जनसंवाद सभेच्या प्रारंभी मागील सभेत आलेल्या तक्रारींवर महापालिकेच्या वतीने केलेल्या कार्यवाहीबाबत आढावा घेण्यात येतो. तक्रारींची वाढती संख्या आणि त्यांचे स्वरूप पाहता तक्रारींचे निवारण करण्यासाठी महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरेसा वेळ उपलब्ध होत नसल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. जनसंवाद सभेत आलेल्या तक्रारींचे वेळेत निवारण न झाल्याने पुढील जनसंवाद सभेत तक्रारींचा आढावा घेतला असता अनेक तक्रारी प्रलंबित असल्याचे आढळून येत आहे.
तक्रारी वेळेत सुटत नसल्याचे कारण
जनसंवाद सभेत येणारे नागरिक अनेक तक्रारी घेऊन येतात. जनसंवाद सभेत येणाऱ्या नागरिकांची संख्या सरासरी शंभराच्या आत असली तरीही प्रत्यक्षात तक्रारींची संख्या त्यापेक्षा अधिक आहे. एक नागरिक एकापेक्षा अधिक तक्रारी घेऊन येत असल्यामुळे तक्रारींची संख्या वाढत असून तक्रार निवारणासाठी कालावधी अपुरा पडत आहे. तसेच, महापालिकेच्या कार्यालयांमध्ये इतर कामकाजाच्या दिवशी देखील तक्रारी येतात. त्यांचेही निवारण महापालिका करत असते. या सर्व बाबींचा विचार करून प्राप्त तक्रारी वेळेत निकाली काढण्यासाठी प्रत्येक सोमवार ऐवजी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या सोमवारी क्षेत्रीय कार्यालयांत सकाळी 10 ते 12 या वेळेत जनसंवाद सभा होईल, असे प्रशासनाने कळविले आहे.