* कासरसाईत शेळीची शिकार तर नेऱ्यात कोंबड्या फस्त
* नेरे जांबे कासारसाई ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
हिंजवडी – जागतिक दर्जाच्या हिंजवडी आयटीपार्कचा सीमाभाग असलेल्या नेरे जांबे कासारसाई परिसरात गेले महिनाभरापासून बिबट्या कधी एकटा तर कधी आपल्या पिल्लासह वावरत असल्याने नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. काल रात्री त्याने कासारसाई येथे एक पाळीव शेळीची शिकार केली.
तत्पूर्वी सोमवारी (दि 5 ) सायंकाळी साडेसात आठच्या सुमारास नेरे मारुंजीतील कोलते पाटील टाऊनशीप च्या कुंपणालगत नेरे येथील प्रसिद्ध गोपालक ऍग्रोआयडॉल कैलास जाधव आपल्या गाडीतून घरी जात असताना त्यांना 2 पिल्लासह एका बिबट्याचे दर्शन झाले.गाडीचा आवाज व लाईट पाहून बिबट्याने पिल्लासह कुंपणाच्या पलीकडे उडी मारत रात्रीच्या अंधारात ते गायब झाले.
गेल्या महिन्यात 12 जूनला नेरे गावातून संत तुकाराम साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्याला उसाच्या शेतात बिबट्यांचे दर्शन झाले होते. त्यानंतरही कधी सायंकाळी तर कधी अपरात्री बिबट्याचा वावर दिसत असल्याने या परिसरातील शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे डोळे उघडणार का ? असा सवाल कैलास जाधव यांनी केला आहे.
ते म्हणाले,काल रात्री बिबट्या व त्याची दोन पिल्ले रस्त्याने राम सोनाई फार्म च्या दिशेने जात असताना दिसली. गाडीची लाईट पडल्याने आवाजामुळे त्यांनी कुपणावरून उडी मारून ते पसार झाले.यावेळी पप्पू नामदेव जाधव साईराज कैलास जाधव योगेश सुरेश जाधव यांनी त्यांना पाहिले.
गेल्या महिन्यात नेरे येथील हनुमंत पायगुडे यांच्या 7 ते 8 कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या असून रात्रीचा प्रवास करणाऱ्या लोकांना तसेच पाळीव कुत्र्यांवर हा बिबट्या धावून येत असल्याने त्याच्या दहशतीने जागे राहणाऱ्या नागरिकांना देखील मध्यरात्री कुत्री भुंकू लागल्यानंतर कधी एक तर कधी दोन बिबट्याचे दर्शन होत आहे. गावात अनेकजणांकडे पाळीव जनावरे आहेत त्यामुळे हे बिबटे पाळीव प्राण्यांवर कधीही हल्ला करू शकतात अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
बिबट्याचे परिसरातील वास्तव्या बाबत ग्रामपंचायत व अन्य शेतकऱ्यांनी वनविभागाला कळविले. मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी केवळ घटनास्थळी भेट देऊन पंजाचे ठसे नेले मात्र काही ठोस उपाययोजना केल्या नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांना वनअधिकारी सांगतात की बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याकरिता नागपूर मुख्यालयातून परवानगी घ्यावी लागते . आज पुन्हा बिबट्याचे दर्शन घडल्याने पिंजरा लावण्याची परवानगी कधी मिळणार असा सवाल येथील शेतकर्यांमधून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान काल मध्यरात्री बिबट्याने कासारसाई येथील तुकाराम पवार यांच्या पाळीव शेळीची शिकार केली असल्याची त्यांनी सांगितले. त्यामुळे वनविभाग झोपेतून केव्हा जागा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याबाबत पौड परिक्षेत्रातील कासारसाई बीट चे वनरक्षक रावसाहेब चौरे यांनी टीम सोबत येऊन पंचनामा केला असून तो एका गावात वास्तव्यास नसल्याने पिंजरा लावण्यात अडचणी येत आहे असे त्यांनी ‘प्रभात’शी बोलताना सांगितले.