वाहतूक पोलिसांची वाढली डोकेदुखी; नियंत्रण ठेवण्याचे पोलिसांसमोर आव्हान
पिंपळे निलख – पिंपरी-चिंचवड शहरात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे आहे. परंतु शहरात काही टवाळखोर व रोडरोमिओंकडून वाहतुकीसंबंधीच्या नियमांची पायमल्ली करून एकाच दुचाकीवर तीन ते चार किंवा पाच जण बसून प्रवास करत आहेत. अशा व्यक्तींवर निर्बंध लादणे किंवा त्यांच्यावर कारवाई करणे वाहतूक पोलिसांसमोरील सर्वांत मोठे आव्हान आहे.
शहरातील काळेवाडी, भोसरी, वाकड, चिखली, कुदळवाडी व इतर सर्व भागांत दुचाकीस्वार अवैधरीत्या प्रवास करताना दिसून येत आहेत. काही टवाळखोरांकडून मोठमोठ्याने हॉर्न वाजवत व रेस वाढवत वेगाने गाडी चालवली जात आहे. तर काही बुलेटस्वारांकडून सायलेंसरचा आवाज करत तसेच फटाके फोडत गाडी चालवली जाते. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना तसेच रस्त्यातील इतर वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
बुलेटच्या सायलेंसरचा आवाज करणाऱ्या चालकांवर सध्या शहरात कारवाई सुरू आहे. परंतु तरीदेखील काही बुलेटस्वार सायलेंसर बदलण्यास तयार नाहीत. त्यांच्यावर होणारी दंडात्मक कारवाईचे त्यांना काहीच वाटत नाही. त्यामुळे अशा टवाळखोर व रोडरोमिओंना कायद्याच्या चौकटीत राहून वाहनचालविण्यास प्रवृत्त करण्यास लावणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
जुनी सांगवी, पिंपळे निलख तसेच वाकड इतर ठिकाणी ही तीच परिस्थिती असून, ट्रिपल सीट नवी फॅशन व बडेजाव दाखवण्याची पद्धत सुरू आहे. शहरातील चौकांत कोणत्याही प्रकारचे सिग्नल न पळता लाल सिग्नल असताना नियम मोडणे, वाहतूक पोलिसांना चुकवून जाणे, वेगाने वेडीवाकडी वाहने चालवणे इत्यादी म्हणजे सामान्य परिस्थिती असल्याचे तसेच याविरुद्ध कोणतीही कारवाई होत नाही, अशी धारणा सध्या तरुणांमध्ये दिसत असल्याने वेळीच या सर्व गोष्टी नियंत्रणात आणण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे.
शहरातील शांतता येतेय संपुष्टात
शांत रस्ते, सर्व्हिस रोड तसेच मुख्यतः चौक व आपला म्हणवला जाणाऱ्या परिसरात हे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे अशा टवाळखोर व रोडरोमिओंवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक चौकात वाहतूक पोलिसासोबत एक पोलीस नेमावा तसेच नागरिकांच्या माध्यमातून अशा वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
कारवाईत राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप
बऱ्याच वेळा बेशिस्त वाहनचालकांना वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यास पकडले असता ते लगेच आपल्या परिसरातील दादा, भाऊ अथवा राजकीय वजन असलेल्या व्यक्तीला फोन करून वाहतूक पोलिसांना देतात. त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी देखील नको आपल्या डोक्याला ताप असे म्हणत त्याला काही वेळात सोडून देतात. त्यामुळे नियमांची पायमल्ली करणाऱ्या व्यक्तींचा अधिकच आत्मविशास वाढत असल्याने पुन्हा ते नियम पाळण्याच्या भानगडीत पडत नाहीत. अशा राजकीय व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळेच शहरातील बेशिस्त वाहनचालकांना खतपाणी मिळत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी राजकीय व्यक्तींचा मुलाहिजा न राखता बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.