- काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन; 90 हजार 855 नागरिकांना करोनाची लागण
पिंपरी – महापालिकेने चाचण्यांचे प्रमाण वाढविले नसतानाही दिवाळीनंतर पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाच्या रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. दिवसाला दीडशेहून अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहे. मागील सात दिवसांत तब्बल 1 हजार 172 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 36 जणांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता व्यक्त केली जात असून, शहराची वाटचाल करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या दिशेने सुरू झाल्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
दिवाळीनंतर करोनाची दुसरी लाट येईल, अशी भीती सर्वच क्षेत्रातून वर्तविली जात होती. दिवाळीनंतर शहरातील रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरणे, हात सॅनिटायझ करणे, सुरक्षित अंतर या करोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पालिकेकडून केले जात आहे. दिवाळी अगोदर उतरणीस आलेला करोनाचा आलेख पुन्हा वाढत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात आजपर्यंत 90 हजार 855 नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. त्याचे प्रमाण 2.75 टक्के आहे. करोनाची लागण झालेल्यांपैकी सुमारे 87 हजार 384 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुमारे 96 टक्के असून, मृत्यूदर 1.25 टक्क्यांच्या आसपास आहे.
वैद्यकीयच्या एका सर्व्हेनुसार शहरातील 33.9 टक्के नागरिकांना करोना होऊन गेला आहे. सुमारे साडेआठ लाख नागरिकांमध्ये अँटिबॉडीज विकसित झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
पालिकेने चाचण्यांचे प्रमाण वाढविले नाही. तरी, देखील मागील सात दिवसांत रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे.
दिवाळी सणानंतर रुग्णवाढीचे प्रमाण वाढले आहे. दिवसाला दीडशेहून अधिक नवीन रुग्णांची नोंद होत आहे. सोमवारी (दि. 16) दिवाळी संपली. त्यानंतर मंगळवारी (दि. 17) 98 नवीन रुग्ण, तर 8 मृत्यू, बुधवारी 158 रुग्ण 4 मृत्यू, गुरुवारी 179 रुग्ण 5 मृत्यू, शुक्रवारी 164 रुग्ण 8 मृत्यू, शनिवारी 192 रुग्ण 5 मृत्यू, रविवारी 215 नवीन रुग्ण तर एकही मृत्यू झाला नाही. तर सोमवारी पुन्हा 166 रुग्ण आणि सहा जणांचा मृत्यू झाला. सात दिवसांत तब्बल 1 हजार 172 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 36 जणांचा मृत्यू झाला आहे.
नियमांचे काटेकोरपणे पालन करा- आयुक्त
यासंदर्भात बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, हिवाळा सुरू झाला आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. लक्षणे दिसताच तत्काळ करोनाची चाचणी करुन घ्यावी. करोनाची दुसरी लाट आली नाही. येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पालिकेची वैद्यकीय यंत्रणा सज्ज आहे.
दिवाळीचा फटका
सप्टेंबर महिन्यापासून शहरातील करोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आली. ऑक्टोबरपर्यंत रुग्णसंख्या पाचशेच्या आतमध्ये आली होती. त्यानंतर शंभरच्या आतच रुग्ण आढळत होते. मृत्यूचे प्रमाणही कमी झाले होते. ही दिलासादायक बाब मानली जात होती. पण, दिवाळी सणात नागरिकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी केली. मास्क परिधान करणे, हात सॅनिटायझ, सुरक्षित अंतर या नियमांचे पालन झालेले दिसून आले नाही. त्यामुळे दिवाळीनंतर रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे.