नागरिकांनी व्यक्त केले समाधान
जाधववाडी – राजे शिवाजीनगर येथे पावसाळी पाण्याचा योग्य निचरा होण्याकरिता भूमिगत स्ट्रॉम वॉटर पाइपलाइनचे काम सुरू आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी दहा ते रात्री नऊ तब्बल अकरा तासांपर्यंत एमएनजीएलकडून गॅसपुरवठा खंडित करण्यात येत होता. परंतु “दैनिक प्रभात’ने वृत्त प्रसिद्ध करताच “एमएनजीएल’कडून सायंकाळी साडेसहा वाजता गॅसपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.
पाइपलाइनच्या कामासाठी नागरिक वेठीस’ या मथळ्याखाली “प्रभात’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत गॅसपुरवठा सायंकाळी साडेसहा वाजता करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांची सोय झाली आहे. मागील काही दिवसांपूर्वी पाइपलाइन टाकत असताना गॅसगळती झाली होती. सुरक्षेच्या कारणास्तव पाच दिवसांपासून गॅसपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतल्याने गैरसोय होत असल्याने रात्री नऊऐवजी सायंकाळी साडेसहालाच गॅसपुरवठा करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रभात, नगरसेविका अश्विनी जाधव व राहुल जाधव यांचे आभार मानले.
विकास कामांकरिता थोडा त्रास सहन करावा लागणार आहे. परंतु यासाठी नागरिकांना वेठीस धरले जाऊ नये याची काळजी यापुढे घेतली जाईल.
– अश्विनी जाधव,नगरसेविका
आमच्या सारख्या सर्वसामान्यांच्या समस्या बातमी स्वरूपात मांडली. वृत्त प्रसिद्ध होताच आम्हाला न्याय मिळला आहे. त्यामुळे दै. प्रभात, नगरसेवक व एमएनजीएल अधिकारी व महापालिका अधिकाऱ्यांचे आभार मानले.
– हेमंत चव्हाण, लोकमान्य प्रतिष्ठान, राजे शिवाजीनगर