जाधववाडीतील नागरिकांची वाट बिकट : नऊ वर्षांपासून काम रखडलेले
– प्रकाश गायकर
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील चिखलीतील जाधववाडीमध्ये गेल्या चार वर्षापासून रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. जाधववाडीतील सावता महाराज मंदिर ते विसावा हॉटेलपर्यंत 30 मीटर रस्ता 9 वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी काही भागातील नागरिकांच्या घरावर हातोडा चालवत जागा ताब्यात घेण्यात आली आहे. मात्र गॅस पाइपलाइन चौकातील जागेमध्ये माजी महापौरांनी त्यांचे कार्यालय थाटले आहे. त्यामुळे येथील रस्ता तयार करण्यास अडथळा झाला आहे. कार्यालयाच्या बाजूने तीव्र उतार व वळण असल्याने अनेकदा अपघात झाले आहेत. मात्र विद्यमान नगरसेवक असल्याने सत्तेच्या जोरावर त्यांनी प्रभागातील जनतेचाच रस्ता अडवला आहे.
सावता महाराज मंदिर ते विसावा हॉटेलपर्यंतचा रस्ता मंजूर झाल्यानंतर महापालिकेच्या नगररचना विभागाने मार्किंग केली. त्यामध्ये रस्त्याने बाधित होणाऱ्या नागरिकांच्या घरावर बुलडोझर चालवत रस्त्यासाठी जागा ताब्यात घेण्यात आली. मंजूर केलेला 30 मीटर रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. रस्त्याच्या हद्दीमध्येच माजी महापौरांनी अतिक्रमण करत आपले कार्यालय थाटले आहे.
सावता महाराज मंदिर ते पेट्रोल पाइप लाइन हा तीव्र उताराचा व वळणाचा भाग आहे. पेट्रोल पाइपलाइनच्या बाजूने तीव्र चढ असल्याने अवजड वाहने चढत नाही. त्यामुळे अनेकवेळा अपघात झाले आहेत. माजी महापौरांच्या कार्यालयासमोरच असे प्रकार घडत असतानाही त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
नागरिक त्रस्त, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
या रस्त्याच्या कामामध्ये माजी महापौर राहुल जाधव अडथळा करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. याबाबत नागरिकांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना 10 ऑक्टोबर रोजी सह्यांचे निवेदन दिले आहे. त्यानुसार, विद्यमान नगरसेवक राहुल जाधव व इतर दोघे कामात अडथळा निर्माण करत आहेत. या रस्त्याच्या जागेमध्ये त्यांनी अतिक्रमण करून त्यांचे कार्यालय तयार केले आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी अधिकाऱ्यांना विनंती करूनही रस्त्याचे काम पूर्ण होत नाही. वारंवार याठिकाणी अपघात झाले आहेत. अनेक नागरिक जखमी झाले आहेत. याबाबत विचार करून गावकऱ्यांना न्याय देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मात्र आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीही ग्रामस्थांच्या विनवणीकडे दुर्लक्ष केले आहे.
ज्या ठिकाणी रस्ता अडला आहे तेथील जागा मालकांनी “अ’ व “ब’ पत्र भरून दिले तर दुसऱ्या दिवशी जागा मनपाच्या ताब्यात येते. जागा ताब्यात आली की लगेचच रस्त्याचे काम करता येईल. मात्र संबंधित मालकांनी अ व ब पत्र भरून दिले नाही तर भूसंपादन करावे लागेल, त्यासाठी दोन ते तीन वर्षाचा कालावधी जातो. ज्या ठिकाणी रस्ता अडला आहे, त्या ठिकाणच्या मालकाने “अ’ व “ब’ पत्र भरून दिले तर लगेच रस्त्याचे काम सुरू करता येईल.
– संजय घुबे, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग.
रस्त्याचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. ज्याठिकाणी रस्ता पूर्ण झाला नाही तेथील जागा अद्याप आमच्या ताब्यात आली नाही. नगरचना विभागाकडून जागा ताब्यात घेतली जाते. त्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी काम करण्याचे आदेश दिले जातात. माजी महापौरांनी उभारेलेले कार्यालय नक्की कोणाच्या जागेत आहे हे सांगता येणार नाही. पण ती नगररचना विभागाची जबाबदारी आहे.
– जयवंत जाधव, कार्यकारी अभियंता
गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम रख़डले आहे. प्रभागातील विद्यमान नगरसेवकांनीच रस्त्याच्या हद्दीमध्ये त्यांचे कार्यालय उभारले आहे. याबाबत अधिकाऱ्यांना वारंवार सांगितले. मात्र सगळे अधिकारी त्यांच्या दबावात काम करत आहेत. चौकामध्ये तीव्र उतार आहे. अनेकवेळा तिथे अपघात झाले आहेत. एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार आहे का? अशाप्रकारे लोकप्रतिनिधीच जर अडवणूक करत असतील तर जनतेने कोणाकडे न्याय मागायचा हा प्रश्न आहे.
– विशाल आहेर, ग्रामस्थ
जागा ताब्यात आली नाही. त्यामुळे रस्त्याचे काम रखडले आहे. जागा ताब्यात आल्याशिवाय आम्ही स्थापत्य विभागाला कळवत नाही. जागा ताब्यात आली की कार्यवाही होईल.
– सुनिल शिंदे, नगररचना विभाग
पिंपरी चिंचवड महापालिका, प्रधिकरण आणि गायरान यांच्या हद्दीमधील जागा आहे. केलेले आरोप चुकीचे आहेत. जेवढा रस्ता आहे तेवढा करण्यास माझी काही हरकत नाही. ज्यावेळी प्राधिकरण मार्किंग करून देईल त्यावेळी पूर्ण रस्ता करा. त्या रस्त्याच्या टीडीआर मी घेतला नाही. त्यामुळे रस्ता करायचा की नाही हे माझ्या मनावर आहे. प्रशासनाला रस्ता करायला हरकत नाही. माझे “ब’ पत्र देऊन भरून घ्यावे. ती प्राधिकरणाची हद्द असो, किंवा गायरानाची असो मी रस्ता द्यायला तयार आहे. जी नागरिकांची मागणी आहे, त्याच्याशी सहमत आहे.
– राहुल जाधव, माजी महापौर व विद्यमान नगरसेवक