पिंपरी -पानांच्या पत्रावळ्यांची आता मागणी घटली. या पत्रावळ्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. बंदी असूनही प्लास्टिकच्या पत्रावळयांचा वापर सर्रासपणे वाढला. इको फ्रेंडली पत्रावल्यांचा शहरासह ग्रामीण भागातही विसर पडत आहे.
काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागात लग्न, साखरपुडा, जावळ, वाढदिवस यासारखा कोणताही कार्यक्रम असो. हाताने प्रत्येक ठिकाणी कारागिराने हाताने पानांपासून बनवलेल्या पत्रावळी व द्रोणला मागणी असायची. सर्वच नागरिक या हाताने बनविलेल्या नैसर्गिक पत्रावळी घेत असत. केळीची पाने त्याचप्रमाणे पळसाच्या पानांपासून या पत्रावळ्या तयार केल्या जायच्या. खास करून केळीच्या पानावर जेवणाची पंगत परंपरा जपली जायची. मात्र कोणताही छोटा-मोठा कार्यक्रम असो, नैसर्गिक, पर्यावरणपूरक पत्रावळ्यांना फाटा देऊन प्लॅस्टिकचे आवरण असलेल्या पत्रावळी खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. ग्रामीण भागातील किराणा दुकानात या पत्रावळ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्या अनेकजण खरेदी करीत आहेत.
ग्रामीण भागातील पत्रावळ्यांची कलाही संकटात
ग्रामीण भागात मोठया प्रमाणात झाडांच्या पानांपासून नैसर्गिक पत्रावळी तयार केल्या जात होत्या. केळीची पाने, पळसाची पाने तोडून आणून एकमेकांना काडीने जोडली जायची. यापासून या पत्रावळ्या तयार केल्या जात असत. मोठ्या प्रमाणात या पत्रावळ्या विक्री केल्या जायच्या. आता मात्र परिसरातूनच नाही, तर ग्रामीण भागातून या पत्रावळया नामशेष झाल्या आहेत. पत्रावळ्या बनवण्याची कामे पूर्वी घरातील लहान-थोर एकत्र बसून करीत असत. आता पत्रावळया बनवण्याची कलाही संकटात सापडली आहे.