पिंपरी – करोनाच्या तडाख्यात अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले. कुणाच्या डोक्यावरील पित्याचे छत्र हरपले तर कोणी मातेच्या प्रेमाला पारखे झाले. कोणी आपल्या भावाला, कोणी बहिणीला कायमचे अंतरले.
आपल्याला जीवलगांशिवाय सणवार साजरा करण्याच्या वेदना सहन करणाऱ्या भगिनींचा विसर “माझा प्रभाग, माझी जबाबदारी’ म्हणून छाती ठोकपणे सांगणाऱ्या तमाम “राजकीय’ बंधूरायांना पडला. म्हणूनच रविवारी साजरा झालेल्या रक्षाबंधन सणाला शहरातील तब्बल दोन हजार 200 विधवा भगिनींकडून राखी बांधून त्यांच्या
दुःखी जीवनात आधाराची एक ज्योत पेटविण्याचा प्रयत्न “भाऊ’ मंडळींकडून झाला नाही ही अत्यंत खेदजनक बाब ठरली आहे.
रविवारी रक्षाबंधनाला कोणी झाडांना राखी बांधली तर कोणी लष्करातील शहीद जवानांच्या घरी जाऊन रक्षाबंधन केले. मात्र, करोनामुळे पिंपरी चिंचवड शहरातील दोन हजार 200 पेक्षा अधिक महिला विधवा झाल्या. या महिलांच्या घरी जाऊन रक्षाबंधन साजरा करण्याची तसदी एकाही नेत्याने अथवा कार्यकर्त्यांनी घेतली नाही. अथवा त्यांचे दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही.
नेहमी काहीतरी वेगळे करून प्रसिद्धी मिळविण्याचा खटाटोप शहरातील काही नेतेमंडळी तसेच सामाजिक कार्यकर्ते करीत असतात. कधी पोलिसांना राखी बांधली जाते, तर कधी अनाथ आश्रमात जाऊन रक्षाबंधन करतात. करोना योद्धा म्हणूनही काही जणांनी डॉक्टरांना राख्या बांधल्या. राजकीय नेत्यांच्या कार्यालयात तर रक्षाबंधनासाठी महिलांची रांगच लागलेली असते.
आपण किती लोकप्रिय आहोत, याचा अभिमान हे राजकीय नेते विविध मार्गांनी दाखवून देतच असतात. शहीद जवानांच्या घरी जाऊन रक्षाबंधन करणे, झाडांना राखी बांधणे, या गोष्टी प्रसिद्धीसाठी चांगल्या असल्या तरी करोनाकाळात ज्यांनी आपले नातलग गमावले आहेत, त्यांची आठवण शहरातील राजकीय नेत्यांना झाली नाही, ही बाब अत्यंत खेद व्यक्त करणारी ठरली आहे.
“राजकीय’ भाऊ पाठीशी उभा राहिलाच नाही
शहरातील दोन हजार दोनशे महिला विधवा झाल्याचा महापालिकेचा आकडा आहे. कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्याही घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. निवडणुका जवळ आल्याने शहरात “माझा प्रभाग, माझी जबाबदारी’ असे छाती ठोकपणे सांगणारे नेते रक्षाबंधनाच्या सणाच्या दिवशी आपल्याच कार्यकर्त्यांमध्ये मग्न असल्याचे दिसून आले. रक्षाबंधनाच्या काळात शहरातील एकाही नेत्याने या विधवा महिलांच्या घरी जाऊन राखी बांधून घेतली नाही. ज्या महिलांना मानसिक आधाराची अत्यंत गरज आहे, अशांच्या घरी जाऊन “मी तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी आहे’, असे सांगणारे नेते दुर्दैवाने कुठेच दिसले नाहीत.