पिंपरी- गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्वच गोरगरिबांना आनंदाचा शिधा मिळणार की नाही यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. याचं कारण म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे या शिधावाटपाला उशीर होण्याची शक्यता आहे. शासन स्तरावरुन शहरातील लाभार्थ्यांची आकडेवारी घेण्यात आली आहे. मात्र अजून पुढे काहीही हालचाल न झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, गुढीपाडवा आता फक्त पाच दिवसांवर आला आहे, त्यातही एक रविवार आहे. यामुळेच चार दिवसात ट्रकमध्ये माल भरणार कधी? तो प्रत्येक जिल्ह्यातील रेशन दुकानांवर पोहोचणार कधी? आणि वाटपाला सुरुवात होणार कधी? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळेही शिधा वाटप प्रक्रियेला उशीर होण्याची शक्यता आहे. शासन स्तरावरुन प्रत्येक जिल्ह्यातील लाभार्थ्यांची आकडेवारी घेण्यात आली आहे मात्र अजून पुढे काहीही हालचाल न झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. दिवाळीत अनेक लाभार्थ्यांना दिवाळी उलटून गेल्यानंतर देखील शिधा मिळाला नव्हता. आता गुढीपाडवा तोंडावर आला आहे. अद्याप आनंदाचा शिधा स्वस्त धान्य दुकानापर्यंत पोहचलेला नाही.
राज्यातील केशरी आणि पिवळ्या रेशनकार्ड धारकांना हा शिधा देण्यात येणार आहे. राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयांत आनंदाचा शिधा वाटण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 कोटी 63 लाख शिधा पत्रिकाधारकांना याचा लाभ मिळणार आहे. दारिद्य्र रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना एक किलो रवा, एक किलो चनाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल मिळणार आहे. याबाबत पुरवठा अधिकारी दिनेश तावरे यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.
गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा वाटप करण्याबाबतचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. मात्र, अद्यापही रेशनिंग दुकानदारांपर्यंत हे किट पोहचलेले नाही. हे किट उपलब्ध झाल्यानंतर तत्काळ लाभार्थ्यांना वाटप सुरू केले जाईल.
-विजय गुप्ता, खजिनदार, ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकीपर फेडरेशन
शासनाच्या या उपक्रमाचा आमच्यासारख्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळत आहे. दिवाळीतही आम्हाला वेळेवर आनंदाचा शिधा किट मिळाले नव्हते. यावेळीदेखील हे किट वेळेत मिळेल, अशी शक्यता वाटत नाही.
– एक ग्राहक